संजीवनीच्या सात अभियंत्यांची स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीत निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने येथिल महाविद्यालयात पालकांनी दाखल केलेल्या त्यांच्या पाल्यांस व महाविद्यालयात प्रत्येक शिक्षकाने आपले लहान भाऊ-बहिण समजुन अतिशय तळमळीने शिकविलेल्या प्रत्येक गरजु नवोदित अभियंत्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्याच पाहीजे, असा विडाच उचलला आहे.

या विभागाच्या प्रयत्नास उदंड प्रतिसादही मिळत आहे. यानुसार स्टर्लिंग अँड विल्सन या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या मुलाखतींचा निकाल जाहिर केला असुन त्यात संजीवनीच्या सात अभियंत्यांची प्रत्येकी वार्षिक पॅकेज रू ५.२६ लाखांवर निवड करून तसे नियुक्ती पत्र दिले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्रवक्त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

स्टर्लिंग अँड विल्सन ही पॉवर, सोलर एनर्जी, डेटा सेंटर, डीझेल जनरेटर सेट, को-जनरेशन प्लांटस्, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, इत्यादी क्षेत्रात जगातील ३० पेक्षा अधिक देशात  कार्यरत आहे. या कंपनीमध्ये संजीवनीचे अनेक माजी विद्यार्थी कार्यरत असुन त्यांच्या उत्तम कामगिरीमुळेच कंपनीला गरज असलेल्या अभियंत्यांसाठी संजीवनीची निवड प्राधान्याने झाली.

आता कंपनीने जयेश  गोरक्षनाथ ढोकणे, शुभम बाळासाहेब गागरे, शुभम सुभाष  हिवाळे, विराज प्रविण हांडे, ऋतुजा मच्छिंद्र थोट, वैभव संजय आंधळे व ऋतुजा सुभाष  कदम यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्याने वेगवेगळ्या कंपन्यांना अभिप्रेत असलेले अभियंते संजीवनी मधुन मिळत आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.

संजीवनी मधुन विध्यार्थ्यांना एका पाठोपाठ एक अशा मिळत असलेल्या नोकऱ्यांचा डंका सर्वदुर पसरला आहे. यावर समाधान व्यक्त करून संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विध्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

अमित कोल्हे यांनी सात पैकी पाच उपस्थित असलेल्या अभियंत्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. डी. बी. क्षिरसागर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. विनोद तिडके, विभाग प्रमुख डॉ.प्रसाद पटारे, डॉ. दिपेश  परदेशी, विभाग समन्वयक उपस्थित होते.

‘मी शेवगांव तालुक्यातील सोनेसांगवी गावचा शेतकरी आहे. मला एक मुलगा व एक मुलगी आहे. मला जेमतेम तीन एकर शेती असुन निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक अडचणी आल्यात, परंतु हार मानली नाही. बहिण भावाला जिध्दिने शिकविले. ज्या यातना व कष्ट आमच्या वाट्याला आले, ते त्यांच्या वाट्याला येवुच नये, असे मनोमन वाटायचे. म्हणुन मोठ्या आशेने मुलगा वैभवला प्रथम संजीवनी पॉलीटेक्निक मध्ये दाखल केले. तेथे त्याला पॉलीटेक्निकच्या प्रयत्नांमुळे वयाच्या १९ व्या वर्षीच  नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी होती, परंतु त्याला संजीवनी मध्येच पदवी पुर्ण करायची होती. वैभवला चांगले मार्कस् असल्यामुळे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळाला. आमची हलाखीची परीस्थिती होती मात्र वैभवला संजीवनीच्या प्रयत्नाने नोकरी मिळणारच म्हणुन आम्हा पती पत्नीच्या कष्टांचे कधीच काही वाटले नाही. वैभवला सुरूवातीस रू ५.२६ लाखांचे पॅकेज मिळाले, याचा आनंद व्यक्त करणे अवघड आहे. आमचे स्वप्न संजीवनीने पुर्ण केले, मी आयुष्यभर संजीवनीचा ऋणी राहील. – पालक संजय आंधळे