२५ हजारापेक्षा जास्त गरजू लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला -आमदार आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : महायुती शासनच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत असून, काकडी येथे येणाऱ्या लाभार्थ्यांना कोणताही त्रास होणार याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना आमदार काळे यांनी दिल्या आहेत.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील काकडी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पूर्व तयारी बाबत पंचायत समिती कार्यालयाच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आ. आशुतोष काळे बोलत होते.

२०१९ च्या निवडणुकीत निवडून आल्यापासून आजवर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. जे पात्र लाभार्थी मागील काही वर्षापासून वंचित आहेत. ज्यांना खरोखर अडी-अडचणी होत्या, ज्यांना या योजनेची अत्यंत गरज होती.

अशा सर्व लाभार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेवून त्या उपक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत महसूल विभाग, पंचायत समिती, नगरपालिका, कृषी विभाग, दिव्यांग विभाग, इतरही शासनाच्या ज्या काही योजना असतील, अशा सर्व योजनांचा तालुक्यातील जवळपास २५ ते ३० हजार गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे.

हा उपक्रम नियमितपणे सुरु ठेवत या उपक्रमाला गती देवून काकडी येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देखील १८०० गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेस पात्र ठरल्याच्या मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार काळे यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी या लाभार्थ्यांना घेवून येतांना शासकीय यंत्रणेने या लाभार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी. हे लाभार्थी समाजातील गोर गरीब, विकलांग, गरजू आहेत. त्यांची योग्य ती काळजी घेवून त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शासकीय यंत्रणेने या लाभार्थ्यांना घेवून येण्यासाठी व परतीच्या प्रवासात कुठलाही त्रास झाल्यास त्याची जबाबदरी संबंधित यंत्रणेवर राहणार असून, याचा त्या अधिकाऱ्याला त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा यावेळी आ. आशुतोष काळे यांनी दिला.

यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, तहसिलदार संदीपकुमार भोसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, सर्व संचालक, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक, तालुक्यातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.