कामाच्या आवडीतुन यश निश्चित – व्यंकटेकश  

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : आवडीने कार्य करणारे लोकच कोणत्याही कामाच्या यशाचे आधारस्तंभ असतात. असे लोक आपल्या कामातुन उत्तम कामगिरी दाखवुन देतात. कोणतेही कार्य आवडीने केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन वार्टसिला इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकिय संचालक श्री व्यंकटेश आर. यांनी केले.

‘संजीवनी थॉट लिडर’ हे संजीवनी शैक्षणिक संकुल आणि उद्योग यांच्यातील सुसंवाद साधण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे. यात उद्योग जगतातील आघाडीच्या दिग्गजांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने आयोजीत ‘संजीवनी थॉट लिडर’ या कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना व्यंकटेश आर. प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते.

सदर प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, वार्टसिला इंडिया प्रा. लि.च्या क्रेडिट मॅनेजर उमा व्यंकटेश, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर (प्रभारी) डॉ. डी. बी. क्षिरसागर, संजीवनी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे डायरेक्टर डॉ. विनोद मालकर, हेड-कार्पोरेट रिलेशन्स इम्राण शेख, विभाग प्रमुख, डीन्स, आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनिय होती. प्रत्येक शैक्षणिक वर्षात संजीवनी संकूल संचलित प्रत्येक व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये असे कार्यक्रम घेण्यात येतात.

वार्टसिला ही मुळची फिनलॅन्डस्थित कंपनी असुन या कंपनी मार्फत सागरी आणि ऊर्जा उद्योगासाठी आत्याधुनिक यंत्रे पुरविली जातात. फिनलॅन्ड हा जगातील एक आनंदी देश आहे. तेथिल शिक्षण पध्दतीही उत्तम आहे. या अनुषंगाने अमित कोल्हे यांचे संकल्पनेतुन विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन देवुन आनंदी करण्याच्या हेतुने या चालु वर्षाच्या संजीवनी थॉट लिडर कार्यक्रमाची सुरूवात वार्टसिला कंपनीचे व्यवस्थाकिय संचालक व्यंकटेश आर. यांना आमंत्रित करून झाली. डॉ. क्षिरसागर यांनी प्रास्तविकात संजीवनी थॉट लिडर कार्यक्रमाचा हेतु स्पष्ट करीत संजीवनीच्या विविध उलब्धींबाबत थोडक्यात माहिती दिली.

व्यंकटेश  आर. पुढे म्हणाले की प्रत्येकामध्ये लिडरशिप  (नेतृत्व गुण) असणे गरजेचे आहे. त्यासाठी ध्येय निश्चिती, ध्येयाकडे जाण्यासाठी प्रेरणा घेणे, संबंधिताशी सुसंवाद साधुन नियोजन करणे, नियोजनात दूरदृष्टीतीचा अंतर्भाव करणे आणि योग्य दिशेने वाटचाल करणे, इत्यादी घटकांचा अंतर्भाव केल्यास नेतृत्व गुण विकासाला चालना मिळते. जेथे सांघिक काम (टीम वर्क) असेल तेथे टीम मधिल प्रत्येकाने एकत्र येवुन ध्येय प्राप्तीकडे मार्गस्थ व्हायचे असते.

तसेच प्रत्येक उद्योगामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटला अतिशय महत्व असते असे सांगुन ते म्हणाले यात अंदाज, नियोजन, प्रेरणा, प्रत्यक्ष कृती, नियंत्रण, अचुक निर्णय, इत्यादी बाबी व्यवस्थित अवलंबिल्या तर यश हमखास मिळते. प्रगत देशातील चांगले तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला विकसित करा, चांगल्या उद्योगात शिरकाव करून स्वतःचे करीअर घडवा, असा सल्ला शेवटी व्यंकटेश यांनी दिला. सदर प्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापकांनी विचारलेल्या विविध प्रश्नाची उत्तरेही त्यांनी दिली. डॉ. विशाल तिडके यांनी आभार मानले.