अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची निवड

कोपरगाव प्रतीनिधी, दि. २०: येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांची अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल विवेक कोल्हे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशन, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल आणि कोपरगाव तालुका क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आज शालेय विद्यार्थ्यांसाठी (१४ वर्षे, १७ वर्षे आणि १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली) जिल्हास्तरीय तलवारबाजी (फेन्सिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  

यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते ज्येष्ठ तलवारबाजी खेळाडू दिलीप घोडके यांनी महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेच्या अध्यक्षांशी चर्चा करून अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांची निवड केली. कोल्हे यांनी जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त करून नगर जिल्ह्यात तलवारबाजी खेळाडूंना अत्याधुनिक सोयी-सुविधा व तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त तलवारबाजपटू राज्य व देश पातळीवर कसे झळकतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ तलवारबाजी खेळाडू दिलीप घोडके, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे ॲकॅडमिक हेड हरिभाऊ नळे, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मोहसीन शेख, प्रा.दत्ता देवकर, प्रा. नीलेश बडजाते (कोपरगाव), प्रा. भागवत उगले (संगमनेर), प्रा. बबन सातकर (राहाता) आदींची प्रमुख उपस्थिती होती. पंच म्हणून शिवप्रसाद चंद्रकांत साठे व आकाश लकारे यांनी काम पाहिले.

तलवारबाजी, दांडपट्टा यांसारखे युद्धकलेचे प्रकार महाराष्ट्राच्या मातीत अगदी खोलवर रुजले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या व महाराष्ट्राची लढाऊ वृत्ती अधोरेखित करणाऱ्या तलवारबाजी या खेळाला फार पूर्वीपासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तलवारबाजी खेळाची सुरुवात २००० साली झाली. १४ वर्षे, १७ वर्षे आणि १९ वर्षे वयोगटात हा खेळ खेळला जातो.

या खेळामध्ये फॉईल, इपी आणि सेबर असे तीन प्रकार असतात. आतापर्यंत कोपरगावातील १४ तलवारबाजी खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली असून, २ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. ९ खेळाडूंची अखिल भारतीय विद्यापीठ पातळीवर निवड झालेली आहे. कोपरगावच्या शबाना शेख या खेळाडूने सन २०१९ मध्ये झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे.