२०२२ च्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची कार्यवाही तातडीने करा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे होऊन बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. अशा अनेक  शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी तातडीने कार्यवाही करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत प्रशासनाला दिल्या आहेत.

आ. आशुतोष काळे यांनी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्या समवेत २०२२ मधील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, सावळीविहीर-कोपरगाव एन.एच. ७५२-जी साठी करण्यात आलेल्या व सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही. टॉवर लाईनसाठी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, अस्मानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे अपेक्षित पाऊस मतदार संघात पडला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे तर मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिंकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत असतांना बहुतांश शेतकऱ्यांना मागील वर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आजवर मिळालेली नाही. त्यामुळे त्याबाबत महसूल प्रशासनाने त्यातील त्रुटी दूर करून त्याबाबत तातडीने कार्यवाही करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

तसेच कोपरगाव मतदार संघातून जाणाऱ्या एन.एच. ७५२-जी सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यासाठी व सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही. टॉवर लाईनसाठी कोपरगाव मतदार संघातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना देखील त्यांच्या जमिनीचा मोबदला द्या. शेतकऱ्यांच्या अडचणी शिल्लक राहणार नाही व शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

यावेळी भूमिलेख उपाधिक्षक संजय भास्कर, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, दिलीप बोरणारे, महापारेषण चे सहाय्यक अभियंता गंगाधर सूर्यवंशी, अविनाश काये, एस.ए. यादव कंपनीचे बडगुजर, विजय पालवे, प्रमोद हजारे, राजेंद्र कासार, विजय कदम, सुरज हुसळे, भाऊसाहेब वाकचौरे, जालिंदरकर संवत्सरकर, कैलास संवत्सरकर, गणेश बारहाते, दत्तात्रय कंक्राळे, डॉ. अमोल अजमेरे, अनुप कातकडे, रवींद्र भाबड, बाळासाहेब सुपेकर आदी उपस्थित होते.