सर्व पाझर तलाव भरले जावून पाण्याचा प्रश्न सुटणार आमदार काळे यांच्या प्रयत्नाचे फलित

कोपरगावप्रतिनिधी, दि.१८ : निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील सर्व गावातील पाझर तलाव भरले जावून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या सुरु असलेला सततचा पाठपुरावा व अविरत प्रयत्नांना यश मिळाले असून लाभ क्षेत्रातील सर्व गावातील पाझर तलाव भरण्यासाठी अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी देण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

निळवंडे कालव्यांची चाचणी पूर्ण झाल्यामुळे कधी आपल्या गावात पाणी येते यासाठी लाभधारक क्षेत्रातील शेतकरी व नागरिक निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याकडे डोळे लावून बसले होते. याची जाणीव असलेल्या आ. आशुतोष काळे यांनी निळवंडे डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेवून लवकरात लवकर डाव्या कालव्याचे पाणी लाभक्षेत्रात कसे पोहोचेल. यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.

वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिरायती गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी बुजविण्यात आलेले ओढे, नाले आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने उकरण्यात आली असून सिमेंट पाईप देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी निकाल काय लागतील याची पर्वा न करता. आ. आशुतोष काळे निळवंडे कालव्याचा आढावा घेण्यासाठी गेले होते. यावरून त्यांना जिरायती गावतील नागरिकांना पाणी मिळवून देण्याची तळमळ दिसून येत असून त्यांची तळमळ व त्यांचा पाठपुरावा अखेर यशस्वी झाला आहे.

गुरुवार (दि.१६) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी लाभक्षेत्रातील असंख्य शेतकऱ्यांना समवेत घेवून आ.आशुतोष काळे या बैठकीला हजर होते. या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या मागणीनुसार निळवंडे डाव्या कालव्याला अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली असून कोपरगाव मतदारसंघातील निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांतील पाझर तलाव भरुन दिले जाणार आहेत.

त्याचा फायदा काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद तसेच मतदार संघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील नागरिकांना होणार. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

त्यामुळे मागील अनेक वर्षापासून चातकासारखी निळवंडेच्या पाण्याची वाट पाहणाऱ्या या गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. या बैठकीसाठी अनेक मान्यवरांसमवेत निळवंडे डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, कार्यकारी अभियंता श्रीमती सहाणे, उप कार्यकारी अभियंता विवेक लव्हाट आदींसह लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.