बसमध्ये चढतांना ३२ हजाराची रोकड चोरटयांनी पळवली

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : तालुक्यातील शिंगणापुर येथील माजी सरपंच यादव कोंडाजी संवत्सरकर यांची कन्या कविता महेंद्र कु-हे हया माहेरी आल्या होत्या. त्या कोपरगाव बसस्थानक येथुन कोपरगाव नाशिक या गाडीने चढत असतांना त्यांच्या हातातील बॅगमधील पर्स मधुन ३२ हजार रूपयांची रोकड चोरटयांनी लंपास केली. याबाबत अजुनही तपास लागत नाही, तेंव्हा या चो-यांना कोपरगावचे पोलिस आळा घालतील का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनांत निर्माण झाला आहे. 

कोपरगाव बसस्थानकाचे आधुनिकीकरण झाले त्यात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र, ते उजव्या बाजुस आहेत. तर बसचा दरवाजा डाव्या बाजुस असल्याने कोपरगाव नाशिक गाडीतुन प्रवास करताना कविता कु-हे हया बसमध्ये चढण्यासाठी दरवाजा जवळ गर्दी असल्याने उभ्या राहिल्या. गर्दीचा फायदा चोरटयांनी घेत त्यांच्या दोन्ही हातात बॅगा असल्याने अज्ञात चोरटयांनी त्यांच्या बॅगेतील पर्सची चैन उघडुन त्यातील रोख रक्कम ३२ हजार रूपयांवर डल्ला मारला.

त्याचवेळेस रुपाली चव्हाणके खडकी येथील महिलेचे देखील रोकड ५ हजार रूपये चोरटयांनी चोरले तर दुस-या एका महिलेच्या गळयातील सोन्याची पोत चोरली एव्हढया घटना घडुनही पोलिसांकडून अद्यापही याचा तपास नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक याबाबत खेद व्यक्त करत आहेत. माजी सरपंच यादव संवत्सरकर यांना कोपरगाव पोलिस स्थानकामध्ये दिवसभर बसवून ठेवण्यांत आले. त्यांची तक्रार नोंदविण्यांत आली. त्यावर ते म्हणाले की, कोपरगाव बसस्थानकावर पोलिस चौकी आहे. पण, ती रिकामीच असते. बसस्थानकावर पोलिसांच गस्त वाढली पाहिजे.

भुरट्या चोऱ्या करणाऱ्यावर पोलिसांचा धाक बसला पाहिजे. कोपरगाव बस स्थानकावर चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व शिर्डी येथील पोलीस उपाधीक्षक यांनी या घटनेत लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा. कोपरगाव पोलीस निरीक्षकांनी या घटना कशा कमी होतील यासाठी जाणीवपूर्वक उपायोजना कराव्या.

पाकीटमारी, सोनसाखळी हिसकवणारे, छेडछाड करणारे, मोबाईल चोरणारे अशा सराईत गुन्हेगारांची छायाचित्रे कोपरगाव बसस्थानकावर लावावी त्याचप्रमाणे कोपरगाव आगर प्रमुखांनी याबाबत काळजी घेऊन, बस प्रवाशांचा प्रवास कसा सुरक्षित होईल हे पहावे. अशी मागणी माजी सरपंच यादव संवत्सरकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.