कारभार झाला गोलमाल त्यामुळे नागरिकांचे होताय हाल – दत्ता काले 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : गाळमिश्रित पाणी देऊन प्रशासन शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दोन वर्षे एकहाती कारभार हाकणारे प्रशासक मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे सोयीस्कर मौन बाळगून ठराविक जणांना हाताशी धरून पालिका चालवत आहे. कर देऊन नागरिकाना मात्र अस्वच्छ पाणी नशिबी आहे का? असा संतप्त सवाल भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी विचारला आहे.

सद्या शहरात असणारा गढूळ पाणी पुरवठा तातडीने बंद झाला नाही तर मुख्याधिकारी यांना ते पाणी पिण्यास भाग पाडू असा इशारा दत्ता काले यांनी दिला आहे

एके काळी ४ दिवस आड पाणी देणे शक्य असताना कुणालाही विश्वासात न घेता लोकप्रतिनिधी, त्यांचे स्विय्य सहाय्यक आणि मुख्याधिकारी असा तीन तिघाडा कारभार जनतेचे हाल होण्यासाठी आज जबाबदार ठरतो आहे. कुणाला तरी खुश करण्यात मुख्याधिकारी व्यस्त असतात. दुष्काळजन्य स्थितीत पुढे पाणीपुरवठा कसा सुरळीत होणार याचे नियोजन शून्य असल्याने ढिसाळ कारभार सुरू आहे.

शहराला ८ दिवसाआड पाणी असल्याने नियमित पाण्याचे स्वप्न तर सोडाच पण स्वच्छ पाणी देखील दिले जात नाही हे दुर्दैव आहे. पालिका प्रशासनावर लोकप्रतिनीधीचा वचक नाही त्यामुळे नागरीकांना वेठीस धरून वागणारे गोसावी हे मनमानी कारभार करून जनतेचे हाल करता आहेत. पाण्यामुळे आरोग्य धोक्यात येते यासाठी मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात आम्ही नेहमी स्वच्छ पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले. अनेकदा निवेदन दिले, परखड मत मांडले. मात्र निद्रिस्त कारभार सुरू आहे, त्यातच भर म्हणजे प्रशासक राज असल्याने फक्त सोयीचे राजकारण करण्यात काही लोक अडकले आहेत अशी टीका काले यांनी केली आहे.