विजवितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

कोपरगाव प्रतिनिधी दि.२ : कोपरगाव तालुक्यातील सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांच्या नेतृत्वाखाली विजवितरण कंपनीच्या विरोधात कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केल्याने विजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची एकच पळापळ सुरु झाली. 

 विजवितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारावर नागरीकामध्ये नाराजी असताना कोपरगाव येथे शेतकऱ्यांनी सामुदायिक आमरण उपोषणाला बसल्याने याचे पडसाद राज्यभर उमटु नये म्हणून महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने चक्र फिरवून शेतकऱ्यांचे उपोषण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले. 

 या संदर्भातील अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा लाईट वेळेवर मिळत नाही तर शेतकऱ्यांना राञी विजपुरवठा करुन महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा रोष वाढत गेल्याने अखेर माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर कोपरगाव तालुका शेतकरी कृति समितीच्या वतीने शेकडो शेतकरी एकाचवेळी आमरण उपोषणाला बसले. 

यामध्ये पद्माकांत कुदळे यांच्या समवेत तुषार विध्वंस, संतोष गंगवाल, काळे कारखान्याचे माजी संचालक छबुराव आव्हाड, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष नितीन शिंदे, विजय जाधव, शिवसेनेचे प्रविण शिंदे, मनसेचे अनिल गायकवाड, लोक स्वराज्य अंदोलन समितीचे  ॲड. नितीन पोळ, आबासाहेब गिरमे, सुभाष पांधरे, दादासाहेब रासकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी आमरण उपोषणात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना दररोज विजपुरवठा पुर्ण दाबाने दिवसा व्हावा, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्वरीत दुरुस्त करावे. विज बिलाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल केले ते मागे घ्यावे, कामात कुचराई करुन नागरीकांना आरेरावी करणाऱ्या विजवितरणच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी.  यासह विजवितरण संदर्भातील विविध दहा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या होत्या.

आखेर दुपारी महावितरणचे विभागीय कार्यकारी अभियंता ए.एम.थोरात.कोपरगावचे अभियंता बी.एन.आचार्य यांनी तातडीने उपोषण कर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या तर युवा नेते विवेक कोल्हे यांनी उपोषण स्थळी भेट देवून शेतकऱ्यांच्या दहा मागण्यावर संबधीत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करीत तातडीने मार्ग काढण्याच्या सुचना केल्याने स़बधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्याने अखेर सायंकाळी तहसीलदार विजय बोरुडे यांच्या हस्ते हे लक्षवेधी उपोषण मागे घेत असल्याचे पद्माकांत कुदळे यांनी सांगितले.

यावेळी कुदळे म्हणाले की, कृषि प्रधान असलेल्या देशात कृषि कुठे आणि प्रधान कुठे आहे. जय जवान, जय किसान फक्त नारा देण्यापुरतेच राहीले. जवान सिमेवर तर किसान राञभर पाणी भरण्यासाठी विजेच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा झाला आहे. शेतकरी करुन करुन काय करेल तर आत्महत्या करेल हा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अभियता थोरात म्हणाले की, यापुढे कोपरगाव तालुक्यातील विजे संदर्भातील सर्व समस्या तातडीने सोडवून पुर्ण दाबाने शेतकऱ्यांना दररोज विजपुरवठा केला जाईल दिलसा व राञी असा कालावधी ठरवून आठवड्यातुन चार दिवस दिवसा व तीन दिवस राञी विजपुरवठा केला जाईल. शेतकऱ्यांना आरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असे अभिवचन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

तहसीलदार विजय बोरूडे, युवानेते विवेक कोल्हे, विजवितरणचे अभियंता थोरात यांच्या मध्यस्थीने विजेच्या समस्येवर पडदा पाडण्याची प्रक्रीया सुरू झाली.  या लक्षवेधी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, भाजपचे पराग संधान, शिवसेनेचे प्रमोद लबडे,शिवाजी ठाकरे, उत्तमराव कु-हाडे, स्वप्निल निखाडे, एम. टी. रोहमारे  यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी संघटनाचे पदाधिकारी, तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देवुन पाठींबा दिला.