भांडवलशाही धोरणामुळे शासनाला शेतकरी आठवेना – कॉ. सुभाष लांडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : शेतकऱ्यांना मता पुरते वापरायचे अन् देशासह राज्यात भांडवलशाही विचाराचं राजकारण करून निवडणुका जिंकायच्या तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणून बुजून डोळे झाक करायची हीच नीती देशासह राज्यात वापरल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सरकार विरुद्ध संतापाची लाट असून एकीकडे अधिवेशनात प्रश्न मांडावा यासाठी शिंदे सारख्या युवकांना उपोषणाची वेळ येते. ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने खेदाची गोष्ट आहे. शिंदे यांनी मांडलेल्या मागण्या रास्त असून त्या अधिवेशनात चर्चा होऊन मार्ग निघावा. अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या मनात असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. सुभाष पाटील लांडे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेण्याची गरज –        नवीन दहिफळ येथे गेली सहा दिवसापासून शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडावा व त्यावर निर्णय घ्यावा या मागणीसाठी बाळासाहेब शिंदे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी बळ दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्याला जाब विचारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आता आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे भविष्यातील प्रश्न अधिक गंभीर होतील.                        दत्ता फुंदे
जिल्हा उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

   तालुक्यातील नवीन दहिफळ येथे हनुमान मंदिरात बाळासाहेब शिंदे यांनी सुरू केलेले  बेमुदत उपोषण सोडते वेळी कॉ. लांडे शासनाच्या भूमिकेवर टीका करतांना बोलत होते. यावेळी ते म्हणाले, एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गोड गोड गप्पा मारायच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे चर्चा न करता भांडवलदारांच्या हिताची चर्चा घडवून भविष्याच्या राजकारणाची गणिते जुळवायची या सरकारची  नीती असल्याची टीका करुन या धोरणाचा त्यांनी तीव्र निषेध केला. त्यानंतर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

              संसदेच्या व विधानसभा हिवाळी अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला योग्य हमीभाव, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांवरील कर्जबाजारीचे संकट, सरकारचे चुकीचे शेतीमाल आयात-निर्यात धोरण, शेतीमालाला भावा अभावी होणारे नुकसान, शेतकऱ्यांना सोसावे लागणारी महागाईची झळ, शेतकरी वर्गातील युवकावर आलेले बेरोजगारीचे संकट या शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावर अधिवेशनात चर्चा करून ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी गेल्या सहा दिवसा पासून  बाळासाहेब सदाशिव शिंदे हे शेतकरी नविन दहिफळ येथे हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषणास बसले होते. 

आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉ. सुभाष पाटील लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, मच्छिंद्र आर्ले, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर, भारत महाराज लोढे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन शिदे यांनी उपोषण स्थगित करुन यापुढे बैठा सत्याग्रह करण्याचा निर्धार शिंदे यांनी जाहीर केला. यावेळी रामकिसन तुजारे, दिपक भोसले, कडुबाळ इथापे, संदिप इथापे, आनंद गांधी, नारायण गंवादे, नारायण गांवढे, शंकर शिंदे, कचरू इसारवाडे, भाऊसाहेब आर्ले, सतिष कणगरे, हरिष जायभाय, शहाराम आगळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.