जगभर संजीवनीचे विद्यार्थी कार्यरत ही संजीवनीच्या संस्कारची पावती – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलीत विविध संस्थांमधिल विद्यार्थी येथुन घेतलेल्या ज्ञानाच्या जोरावर जगभर कार्यरत आहे, ही बाब भुषणावह आहे. आज येथिल माजी विद्यार्थ्यांनी लंडन, अमेरिका सारख्या ठिकाणी आपले उद्योग सुरू करून इतिहास रचला आहे. अनेक जण देश परदेशात उच्च पदांवर आहेत. हे यश म्हणजे आई वडीलांच्या संस्काराबरोबरच संजीवनीच्याही संस्कारांची पावती आहे, असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्स संचलीत इंजिनिअरींग, पॉलीटेक्निक, फार्मसी, सिनिअर कॉलेज व एमबीएच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संस्थेच्या ‘रूबी ज्युबिली’ वर्षाच्या निमित्ताने नुकताच संस्थेच्या भव्य सोलर पार्कच्या सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी कोल्हे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ‘कोपरगाव अल्युमिनाय चाप्टरचे’ अध्यक्ष पंकज चौधरी (हरियाणा), संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, इंजिनिअरींग कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. हेमंत अभ्यंकर, पॉलीटेक्निकचे माजी प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, स्ट्रटेजिक अॅडव्हायझर डॉ. शांतम शुक्ला, डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, डॉ. एस.बी दहिकर प्राचार्य ए. आर मिरीकर, प्रा. निलेश  पेंडभाजे, मेंटर इनचार्ज डॉ. प्रसाद पटारे, माजी विध्यार्थी डीन प्रा. अभिमन्यु सांगळे, आदी उपस्थित होते.  

कोल्हे पुढे म्हणाले की, माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी ४० वर्षांपूर्वी संजीवनी शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. त्यांचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. यात व्यवस्थापनाबरोबरच आजी माजी प्राचार्यांचे व सर्व प्राद्यापकांचेही तसेच माजी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे. संजीवनी शैक्षणिक संकुल जरी ग्रामीण भागात असले तरी विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक सोयी मिळत असुन विविध पातळीवरील सवलतींचाही फायदा मिळत आहे. याचाच एक भाग म्हणुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन मिटॅक्स या कॅनडातील संस्थेशी एआयसीटीई, नवी दिल्ली या संस्थेने केलेल्या सामंजस्य करारामुळे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांना रू ३० लाखांच्या शिश्यवृत्तीसह (प्रत्येकी रू ६ लाख) कॅनडात इंटर्नशिपची संधी मिळाली.

पंतप्रधान मोदींमुळे आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळत आहे, हे यावरून अधोरेखित होत आहे. माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांची ग्रामीण विद्यार्थी नोकरीच्या अथवा उद्योगाच्या माध्यमातुन स्वयंपुर्ण व्हावित ही तळमळ असायची. त्यासाठी संस्था पातळीवर अनेक प्रयत्न होतात. परंतु या मध्ये माजी विद्यार्थ्यांच्याही प्रयत्नाने अनेक नवीन विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत आहेत, ही बाब माजी विद्यार्थ्यांचे संस्थेप्रती असलेल्या योगदानाचे प्रतिक आहे.

आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वार्षिक पॅकेज रू २० लाख पर्यंत पॅकेजच्या नोकऱ्या मिळत आहे, ही बाब स्व.शंकरराव कोल्हे यांनी ४० वर्षांपूर्वी  पाहिलेल्या स्वप्नांची स्वप्न पुर्ती आहे आणि हिच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली आहे. संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था योग्य दिशेने जात असुन कोपरगावच्या वैभवात भर घालीत आहे. आज अनेकांनी येथे येवुन आपल्या आठवणींना उजाळा दिला, म्हणुन या मेळाव्याचे नामकरण ‘स्मरण के २३’ अतिशय समर्पक आहे, असे शेवटी म्हटले.

डॉ.ठाकुर यांनी सर्वांचे स्वागत करून विविध संस्थांचा ४० वर्षातील प्रगतीचा आलेख मांडला. अमित कोल्हे महणाले की, आज येथे संजीवनी हा एक परीवार असुन या परीवारातील अनेक सदस्य येथे आलेत, हा खरा भावनांचा मिलाफ आहे. संजीवनीच्या सर्वच संस्थांनी प्रगती केली असुन यात माजी विद्यार्थ्यांच्या सुचना, ते वेगवेगळ्या मार्गांनी करीत असलेले सहकार्य खुप मोलाचे आहे. पुर्वीचे कोपरगाव बदलले असुन सर्वात महत्वाचे म्हणजे कोपरगावची कनेक्टिव्हिटी विमान सेवा, समृध्दी महामार्ग आणि उत्तर भारत ते दक्षिण भारत महामार्ग, यांमुळे वाढली आहे. भविष्यात कोपरगाव व शिर्डी परीसरात एमआयडीसी येवु घातली असुन उद्योजक माजी विद्यार्थी यांनी आपले उद्योग येथे सुरू करावे, असे आवाहन केले.

सदर प्रसंगी डॉ.अभ्यंकर, डॉ.शुक्ला व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चौधरी यांचीही मनोगते झाली. सुमारे १००० माजी विद्यार्थ्यांनी दोन दिवस येथे हजेरी लावुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही त्यांच्या कुटूंबांसमवेत आले होते. अनेकांनी आपले वर्ग, होस्टेलच्या खोल्या, इत्यादी ठिकाणी जावुन आठवणी जाग्या केल्या. काहींनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेवुन आपली कला अद्यापही जीवंत असल्याचे सिध्द केले. तर काहींनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवुन आपले क्रीडा कौशल्य सिध्द केले. प्रा.पटारे यांनी आभार मानले. प्रशासकीय अधिकारी प्रकाश जाधव याच्यासह अनेकांचे सहकार्य या दोन दिवसीय मेळाव्यास लाभले.