वाहन चालकांच्या संपामुळे पेट्रोल पंपावर उसळली गर्दी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ :  वाहन चालकांच्या संपामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. इंधन वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरचे चालक संपात सामील झाले आणि पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी उसळली.

 या बाबतची अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारने नवीन कायदे अमलात आणले आहेत. त्यात वाहतुक नियम कायद्यात मोठा  बदल करुन अपघात करणाऱ्या  चालकावर कठोर कारवाई  करण्याची तरतुद केली आहे. एखाद्या चालकाने वाहन चालवताना अपघात केला तर त्याला थेट ७ ते १० लाखा पर्यंतचा दंड व दहा वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.

या कायद्याला विरोध म्हणून संपूर्ण देशभरातील वाहन चालकांनी १ जानेवारी पासून बेमुदत संप पुकारला आहे. जो पर्यंत हा कायदा रद्द होणार नाही तो पर्यंत वाहने चालवणार नाही अशी भूमिका घेतल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळित झाले आहे. 

संपाच्या पहील्याच दिवशी इंधनाचा तुटवडा जाणवला. इंधन पुरवठा करणाऱ्या गाड्या न आल्याने अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल सह इतर इंधन संपले तर काही पंपावर इंधन भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोपरगाव शहरातील बहुतांश पेट्रोल पंप इंधन नसल्याने बंद ठेवले तर काही ठिकाणी इंधन साठ उपलब्ध शिल्लक होता. माञ त्या ठिकाणी इंधन घेण्यासाठी  लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

काहींनी आपल्या वाहनात पुर्ण इंधन भरुन झाले तरी, ड्रम बाटल्या भरुन  इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करीत होते. काही नागरीकांना चालकांचा संप आहे याची माहिती नव्हती, माञ अचानक पंपावर गर्दी पाहिल्याने त्यांनी इंधन भरण्यासाठी लगबग सुरु केली. कोपरगावच्या सोसायटी पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा मुबलक असल्याने या ठिकाणी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे.

पंपाच्या व्यवस्थापकांनी योग्य नियोजन केल्यामुळे येथे इंधन सर्वांना मिळाले माञ यांचा साठा संपल्यानंतर नागरिकांची इंधनासाठी वनवन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिच अवस्था इतर दैनंदिन वस्तुंच्या बाबतीत होणार आहे. अनेक जीवनोपयोगी वस्तुंचा तुटवडा भासणार आहे.