सर्व्हे नंबर ४३ व ४४ च्या जमीन धारकांना मोबदला द्या आमदार काळेंची पवारांकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ :- आंबेडकरी समाज बांधवांचा मागील पन्नास वर्षापासूनचा मोबदल्याचा प्रश्न अनुत्तरीत असून या समाज बांधवांना तातडीने मोबदला मिळावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे केली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव शहरातील सर्व्हे नंबर ४३ व ४४ या मधील जमिनीचे शासनाने सन १९४५ ते १९४६ मध्ये अधिग्रहण केले असून त्या कुटूबांना आजतागायत मोबदला न मिळाल्यामुळे आ. आ.आशुतोष काळे यांनी सबंधित कुटुंबांचे प्रतिनिधी सोबत घेवून ना.अजित पवार यांची भेट घेवून त्यांना सविस्तर निवेदन देवून या कुटुंबाची मागणी त्यांच्यापुढे मांडली.

कोपरगाव शहरातील सर्व्हे नंबर ४३ व ४४ या मधील जमिनीचे शासनाने अधिग्रहण केल्यामुळे जवळपास चाळीस ते पन्नास कुटुंब १९४८ पासून भूमिहीन झाली होती. या कुटुंबांना आजतागायत कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्याबाबत भूमिहीन झालेल्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील आपली कैफियत मांडून मोबदला मिळावा अशी मागणी केली होती.

त्या मागणीची दखल घेवून कोपरगाव येथील मामलेदार व तहसीलदार यांनी संबंधित खातेदार यांना मोबदला अदा करण्यात यावा अशा स्वरूपाचा आदेश मा.उपजिल्हाधिकारी अहमदनगर उपविभाग संगमनेर यांनी सन १९४८ साली उपरोक्त जमिनीचा आदेश केला होता. त्याबाबत महसूल राज्य मंत्री ना. संजयजी राठोड यांच्या समोर हेरिंग झालेली आहे. तरी देखील या भूमिहीन कुटुंबांना आजपर्यंत मोबदला मिळालेला नाही.

त्याबाबत आपण व्यक्तिश:लक्ष घालून या भूमिहीन कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे केली.

यावेळी जमीनधारक प्रकाश दुशिंग, राजेंद्र कोपरे, मधुकर कोपरे, संतोष कोपरे, देविदास गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब दुशिंग, संदीप गायकवाड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, प्रशांत वाबळे, हेमंत वाबळे, कैलास कदम, राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते.