पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त महादेव मंदिरात भाविकांची गर्दी 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : जय भोले बम बम भोले चा गजर करत पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शहर व तालुक्यातील शिव मंदिरात भाविक भक्तांची पहाटेपासूनच दर्शनाला गर्दी झाली होती. त्यानिमित्त शिव मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, सडा, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यंदा गोदावरी नदीला मुबलक पाणी आल्याने भाविकांनी गोदावरीच्या पाण्याने शिव मंदिरात महामस्तकाभिषेक केला.

तालुक्यातील संवत्सर येथील शृंगऋषी, विभंडक ऋषी आश्रमात, कोकमठाण येथील हेमाडपंथी , बेट भागातील गुरु शुक्राचार्य, प्रति त्रंबकेश्वर म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र कचेश्वर, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी, अमृतेश्वर,सोमेश्वर सराफ बाजार, राघवेश्वर कुंभारी, शिवानंद गिरी मंजूर, अंकाई टंकाई डोंगर, अंदरसुल येथील महादेव आदी मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त महा मस्तकाभिषेक, रुद्राभिषेक, शिवमहिम्नस्तोत्र, शिव पूजा करण्यात आली. महिला व नागरिकांनी, भावीक भक्तांनी गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साधली तसेच खांद्यावर कावड घेऊन महादेवाला जल अर्पण केले.

  हिंदू धर्मात श्रावण हा सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो. त्यामुळे अनेकजण या श्रावणाची आतुरतेने वाट पाहत असतात. भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे. त्यामुळेच या महिन्याचे महत्त्व आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे अनेकजण यादरम्यान व्रत-वैकल्ये, उपवास करतात. विविध शिवमंदिरांवर आकर्षक विद्युत रोशनी फुलांची सजावट रंगरंगोटी करण्यात आली होती.                   

दरम्यान, उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातही श्रावणाची सुरुवात सोमवारपासून झाली आहे. यंदाच्या श्रावणात एक शुभ संयोग जूळून आल्यामुळे हा श्रावण विशेष मानला जाणार आहे.  यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होणे शुभ मानले जात आहे. त्याचबरोबर यंदाच्या श्रावणात पाच सोमवार आले आहेत. ५ सोमवारांचा योगायोग तब्बल १८ वर्षांनंतर जुळून आला आहे. त्यामुळे हेदेखील एक मोठा योगायोग आहे.

यामुळे यंदाचा श्रावण भाविक भक्तांना विशेष फलप्राप्ती करुन देणार असल्याने या श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे यानिमित्त कोपरगाव गोदावरी नदीकाठी संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने गंगा महाआरतीचे आयोजन केले होते. भाविकांना प्रसाद म्हणून विविध मंडळांच्या वतीने चहा कॉफी दूध साबुदाणा खिचडी तसेच राजगिरा लाडू चिक्की वाटण्यात आली.