सुसंस्कृत, मायाळू व्यक्तिमत्व म्हणजे माई – सुनील जगताप

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : आदरणीय शंकरराव काळे साहेबांच्या प्रेरणेने कै.सौ. सुशीलाबाई उर्फ (माई) यांच्या स्मृती-प्रित्यर्थ ही वक्तृत्व स्पर्धा सुरू करण्यात आली. ही स्पर्धा सुरू करणारे शंकरराव काळे साहेब हे एक सुसंस्कृत, सामाजिक बांधिलकी असलेले, ऋषीतुल्य व्यक्तिमत्व होते. त्यांनी सहजीवन, सहप्रेम जपणुकीचा आदर्श या स्पर्धेच्या निमित्ताने घालून दिला; असे म्हटल्यास वावगे होणार नाही. असे प्रतिपादन सुनील जगताप यांनी केले.

एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये नुकतेच कै.सौ.सुशिलाबाई (माई) शंकररावजी काळे यांच्या स्मृती-प्रित्यर्थ २४ व्या ‘राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून सुनील जगताप बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, वक्ता होणे सोपे नाही. त्यासाठी धाडस, अभ्यास, संवादक्षमता, आवाज असे वक्तृत्त्व गुण अंगी असावे लागतात. वक्त्याने वक्तृत्त्वाची प्रतिक्रिया (फीडबॅक) घेणे आवश्यक आहे. व्हाट्सअपच्या युनिव्हर्सिटी मधून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी वाचन करणे आवश्यक आहे. अशीही सूचना त्यांनी केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरलबॉडी सदस्य पद्माकांत कुदळे हे होते. स्पर्धेच्या निमित्ताने काळे कुटूबियांशी निर्माण झालेल्या ऋणानुबंधाला उजाळा देऊन त्यांनी, काळे कुटुंबीय हे सुशिक्षित असण्याबरोबरच सुसंस्कृत होते याची जाणीव उपस्थितांना करून दिली.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले महाविद्यालय विकास समिती सदस्य महेंद्रशेठ काले हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात वक्तृत्व हे
जीवनात महत्त्वाचे आहे. जो बोलतो त्याचे कुळीद विकतात न बोलणाऱ्याचे गहू पण विकत नाही यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे असे म्हणाले. यावेळी सुनीताताई जगताप, सुनील खिलारी आदी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी प्रास्ताविकातून ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यामागील भूमिका स्पष्ट करत त्यांनी वक्तृत्व
स्पर्धा घेण्याचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हा आहे, तसेच वक्तृत्त्व स्पर्धेमुळे संवाद कौशल्य, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, विचारशक्ती व नेतृत्व गुण वाढीस लागतात. प्रभावी शिक्षण हे समाज प्रबोधन व सर्जनशीलता यासाठी वक्तृत्त्व महत्त्वाचे आहे असे विशद केले. तर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.वैशाली सुपेकर, प्रा.सीमा चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. अर्जुन भागवत मानले. सदर स्पर्धेसाठी डॉ.निर्मला कुलकर्णी, डॉ.छाया शिंदे, प्रा.डॉ.जिभाऊ मोरे हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.