आत्मविश्वासाने महिला कर्तृत्व सिद्ध करते – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ८ :  आज देशाच्या सर्वोच्च स्थानापासुन अर्थ सह विविध मंत्रालये, अंतराळात होणा-या संशोधनाबरोबरच छोटयातल्या छोटया भुषणावह घटनामध्ये घर-दार सांभाळुन महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब जागतिक महिलादिनी गौरवास्पद आहे, महिला धाडसांने विश्व सांभाळत आहे असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

सद्‌गुरू गंगागिर महाराज महाविद्यालय व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिला कल्याण व  स्त्री सबलीकरण या विषयीचे एकदिवसीय चर्चासत्र सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालयात आयोजित करण्यांत आले होते त्याचे उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी गोदावरी नदीच्या महापुरात वाहुन जाणा-या दोन युवकांचे प्राण वाचविल्याबददल ताराबाई पवार व सारेगम लिटील चॅम्प्स विजेती गायिका गौरी पगारे यांचा सत्कार करण्यांत आला.

  प्रारंभी प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी प्रास्तविकात जागतिक महिलादिनाचे महत्व स्पष्ट करत कर्मवीर भाउराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमांतुन वंचितांच्या दारी शिक्षणाची गंगोत्री आणली. तालुक्याचा शैक्षणिक स्तर उंचावण्यांसाठी माजीमंत्री स्व. शंकरराव काळे व स्व. शंकरराव कोल्हे यांनी केलेल्या जाणिवपुर्वक प्रयत्नांची माहिती देत सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालयाच्या प्रगतीचे विवेचन केले.

    विधीज्ञ पूनम गुजराथी यांनी महिलांसाठी असलेल्या कायद्याविषयी माहिती देत पोटगी, सायबर क्राईम याविषयी उपस्थित विद्यार्थीनींचे प्रबोधन करत सखोल मार्गदर्शन केले. समाजात महिलांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

कोपरगांव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी विविध गुन्हयांच्या प्रतिबंधासाठी पोलिस बळाच्या माध्यमांतुन केल्या जाणा-या उपाययोजनांची माहिती देवुन महिलांनी स्वःसंरक्षणासाठी काय करावे, आपल्या घरादारापासुन सार्वजनिक ठिकाणापर्यंत महिलांची सुरक्षीतता किती महत्वाची आहे आणि त्याबाबत नेमकेपणाने काय करावे याचे मार्गदर्शन दिले.

हल्लीच्या युवा पिढीने आततायीपणां टाळावा, थोरा-मोठयांनी त्यांच्या अनुभवातुन केलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. दरम्यान डॉ. मंजुषा गायकवाड यांनी महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकतेवर भर देत मासिक पाळी, आहार, स्वच्छता, लसीकरण महत्वाचे असल्याचे स्पष्ट करत त्यावर सखोल मार्गदर्शन दिले.

अध्यक्षीय भाषणात माजी आमदार कोल्हे बोलतांना पुढे म्हणाल्या की, महिलांच्या अंगी असलेला आत्मविश्वास व जिदद यामुळेच कोपरगांव तालुका स्वयंसहायता बचतगटाच्या चळवळीतुन तालुक्यातील असंख्य महिलांची आर्थीक क्रयशक्ती वाढविण्यांसाठी आपण जाणिवपुर्वक प्रयत्न केले. शासनस्तरावर महिलांना सक्षम करण्यासाठी विविध योजना असुन लाडकी बहिण, अशा सेविका मानधनवाढ याचे महत्व त्यांनी पटवुन दिले.

याप्रसंगी डॉ. सुजित अनुपमा सोनवणे, डॉ मंजुषा वाकचौरे, डॉ वैष्णव आव्हाड, भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली आढाव, विद्याताई सोनवणे, दिपाताई गिरमे, शिल्पाताई रोहमारे, किरनभाभी दगडे, सुवर्णाताई सोनवणे आजी माजी नगरसेवक, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.