आमदार आशुतोष काळेंची जिरायती भागात जलक्रांती – अशोकराव रोहमारे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोपरगाव मतदार संघातील ज्या जिरायती गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याच्या टँकर शिवाय पिण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते. त्या गावांना पाणी मिळेल त्या कालव्यातून पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे या जिरायती गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटलाच आहे. त्याचबरोबर शेती सिंचनाचा देखील प्रश्न सुटला असून भू-गर्भातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

यासाठी आ. आशुतोष काळे यांना वेळप्रसंगी पाटकऱ्याची भूमिका बजवावी लागली असून प्रवरेचे पाणी जिरायती भागात आणून पाणीदार आमदार आशुतोष काळेंनी जिरायती भागात जलक्रांती केली असल्याचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी म्हटले आहे.

ज्या गोष्टी स्वप्नातही शक्य नव्हत्या त्या गोष्टी आ. आशुतोष काळे यांनी करून दाखविल्या आहे. कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती भागातील रांजणगाव देशमुख, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद, मनेगाव, काकडी, मल्हारवाडी, अंजनापूर तसेच मतदार संघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील नागरिकांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.

यातील काही गावांसाठी वरदान ठरलेली उजनी उपसा जलसिंचन योजना २०१४ ते २०१९ बंद राहिली. मात्र हीच योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनीं २००४ ते २०१४ या दहा वर्षात पदरमोड करून चालविली त्याप्रमाणे २०१९ ते २०२४ मध्ये आ. आशुतोष काळे यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हि योजना पाच वर्ष चालविली.

त्यामुळे २०१९ पासून या जिरायती भागातील गावांची परिस्थिती बदलली आहे. मागील वर्षी दुष्काळाची परिस्थिती असतांना आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून निळवंडे कालव्याच्या पाण्यातून पाझर तलाव, बंधारे, साठवण तलाव भरून घेतल्यामुळे दुष्काळाच्या झळा कमी जाणवल्या व यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवली नाही. तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा भेडसावला नाही. आज रोजी आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून या जिरायती गावातील सर्वच बंधारे, साठवण तलाव, पाझर तलाव, ओढे ओव्हर फ्लोच्या पाण्यातून तुडूंब भरल्यामुळे या सर्व गावात जलक्रांती झाल्याचे दिसून येत असून याचे शिल्पकार आ.आशुतोष काळे आहेत हे विसरून चालणार नाही.  

अगोदरच अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघात यावर्षी सप्टेबरच्या अखेरपर्यंत पुरेसा पाऊस झालेला नसला तरी सर्वच धरणक्षेत्रात अपेक्षित पर्जन्यमान होवून सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती.त्याचा फायदा या जिरायती गावांना मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी गोदावरीच्या उजव्या कालव्यातून ओव्हर फ्लोचे पाणी उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून व निळवंडे कालव्यांच्या ओव्हर फ्लोचे पाणी तातपुरत्या चाऱ्यांची निर्मिती करून या दुष्काळी गावातील प्रत्येक साठवण तलाव, पाझर तलाव, बंधारे, ओढ्यापर्यंत पोहोचवून गोदावरी व प्रवरा नदीच्या पाण्याचा संगम घडवून आणतांना ज्या गावात ज्या पद्धतीने पाणी नेता येईल त्या पद्धतीने पाणी पोहोचविले. हे प्रवरेचे पाणी जिरायती भागातून पोहेगाव शिवारापर्यंत येणे अशक्यप्राय गोष्ट होती मात्र ती अशक्यप्राय गोष्ट आ.आशुतोष काळे यांनी आपल्या प्रयत्नातून शक्य करून दाखविली आहे. आजमितीला डांगेवाडीच्या दुसऱ्या पॉइंटवरून मनेगाव बंधाऱ्यात पाणी जमा होत असून लवकरच हे पाणी वेस-सोयगाव बंधाऱ्यात जाणार आहे.

यासाठी वेळप्रसंगी कालव्याच्या फाटकाजवळ ठाण मांडून बसतांना पाटकऱ्याची देखील भूमिका आ.आशुतोष काळे यांना बजावावी लागली.त्यामुळे ह्या जिरायती गावात जलक्रांती होवून हा परिसर पाणीदार झाला आहे. ज्या भागात पडणाऱ्या पावसावर फक्त खरीप हंगामात बाजरीचे पिक घेतले जायचे त्या भागात आज रब्बी हंगामाची देखील तयारी सुरु आहे. ज्या गावात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असतांना ज्या गावात मोजकेच पशु धन होते आज त्याच गावात शेतकऱ्यांच्या दावणीला कित्येक जर्शी गायी दिसत असून गावे पाणीदार झाल्यामुळे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करू लागले आहेत.

हे सर्व पाणीदार आमदार आशुतोष काळेंच्या जलदार क्रांतीमुळे शक्य झाले आहे. ज्या भागात नैसर्गिक परिस्थितीमुळे पाणी नेता येवू शकत नाही त्याठिकाणी यापुढील काळात प्राधान्याने चाऱ्या लवकरात लवकर कशा होतील यासाठी आ.आशुतोष काळे शासनाकडे पाठपुरावा करून व भरीव निधी आणून हे काम पूर्ण करतील असा विश्वास अशोकराव रोहमारे यांनी व्यक्त केला आहे.