कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : बनावट खत असल्याचा धक्कादायक प्रकार तालुका कृषी विभागाने उघडकीस आणला. सुमारे आठ लाख रुपयांचे २८.५ मे.टन बोगस खते विक्रीला बंदी घालण्यात आली असून खते उत्पादित कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. याप्रकरणी व्ही के. फर्टिलायझरचे व्यवस्थापकीय संचालक तुषार बाबासाहेब गरड (राहुरी), तालुका प्रतिनिधी ऋषी हरीश आभाळे (मढी , कोपरगाव ) व कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

याबाबत कोपरगाव तालुका कृषी विभागाचे गुणनियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी फिर्याद दिली. त्यात म्हंटले कि, महालक्ष्मी फर्टिलायझर (पंढरपूर,जिल्हा सोलापूर) यांनी उत्पादित केलेले व व्ही.के. फर्टिलायझर (राहुरी, (अहिल्यानगर) व हवेली (पुणे) यांनी विपणन केलेल्या २०-२०-०० मिश्र खताचे नमुने तपासणीसाठी १३ जानेवारी रोजी घेतले होते. २९ जानेवारी पुणे येथील प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला. त्यात खत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू अधिनियम तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

त्यांच्या अहवालानुसार सदर मिश्र खतात ९६ टक्के पेक्षा अप्रमाणित घटक आढळून आले. परवाना नंबर, उत्पादित मालावर चुकीची माहिती, यासह अनेक बाबींचे उल्लंघन दिसून आले. उत्पादित कंपनीवर अगोदरच गुन्हा दाखल आहे. १७ ऑक्टोबर २०२५ कृषी आयुक्त यांनी सदर कंपनीचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून १० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. कृषी केंद्रांना सदरचे खत विक्री बंदचे आदेश दिले आहेत. सर्व बाबींचा अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे कृषी गुणनियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी दिली.


