डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा महासागर – विजय बोरुडे

गायिका कडुबाई खरात यांच्या गितांनी संविधान सन्मान सोहळा संपन्न 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : जगातील विद्वानांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमांकाने घेतले जाते. जगविजेत्या सिकंदरला तलवारीच्या पात्याने जे जमले नाही ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पेनाच्या टोकाने करुन दाखवले. असे विचार कोपरगावचे  तहसीलदार विजय बोरूडे यांनी व्यक्त केले. 

कोपरगाव येथील घटनापती प्रतिष्ठाण, कोपरे फौंडेशन व आरपीआय उत्तर नगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान सोहळा नहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात, भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष भिक्खू मिलिंद बोधी, भिक्खू संघाचे जिल्हा प्रभारी भिक्खू आनंद सुमनसिरी, सचिव भिक्खू कश्यपजी, आरपीआयचे दिपक गायकवाड,  आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष जितेंद्र रणशुर, भिमा बागुल, बुध्दीस्ट यंगफोर्सचे राजेंद्र ञिभुवन यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

 कोपरगाव मध्ये प्रथमच संविधान दिन सोहळा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता तर प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचे गिते ऐकण्यासाठी कोपरगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ जनसागर उसळला होता. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते ते बोलताना पुढे म्हणाले, संविधान हा चार अक्षरांचा शब्द आज देशातील कोट्यावधी जनतेच्या आत्मसन्मानाचं प्रतिक बनला आहे.

संविधानाने भारताच्या भविष्याची दिशा निश्चित केली आहे. संविधानात कोणताही भेदाभेद केला नाही. सर्वांना समान हक्क दिल्यामुळेच देशातला मजूर किंवा राष्ट्रपतीचा मुलगा असो कायद्यापुढे सर्व समान आहेत. संविधान हे केवळ कायद्याचे दस्तावेज नाही तर घटनाकर्त्याने पाहीलेले भारताच्या उज्ज्वल विकासाचे स्वप्न आहे. तेच स्वप्नं तुम्हा आम्हाला पुढे घेवून जायचे आहे. अधिकारा सोबतच कर्तव्याची जपणुक आपल्याला करायची आहे.

संविधानाचा जागर केवळ एकदिवस करुण चालणार नाही तर आपल्या दैनंदिन जगण्यात संविधानाचे बिजे रूजवावी लागतील. केवळ जयंती, पुण्यतिथीला महामानवांना डोक्यावर घेवून चालणार नाही. त्यांचे विचार आपल्या डोक्यात घेतले पाहीजे. ज्ञान हीच २१ व्या शतकाची खरी ताकत आहे. असेही ते शेवटी सांगुन संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित अनेक पदाधिकारी, मान्यवरांनी संविधान दिनाचे महत्व व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती आपल्या भाषणात व्यक्त केली.

 दरम्यान उपस्थित मान्यवरांना संविधानाच्या प्रति भेट देवून संविधानाचा सन्मान करण्यात आला. हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाला गायिका कडूबाई खरात यांच्या सुरातील गाण्यांची ओढ लागली होते. त्यामुळे राञी उशिरापर्यंत गायिका कडूबाई खरात यांनी भिमगिताच्या मैफिलीतुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कडूबाई खरात यांच्या गाण्यावर उपस्थित  रसिकांनी पैशाचा पाऊस पाडला. यावेळी कडूबाई खरात यांनी आयोजकांचे व कोपरगावच्या तसिकांचे ऋण व्यक्तकरीत संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरपीआय, घटनापती प्रतिष्ठान व कोपरे फौंडेशनचे रवी भालेराव, प्रदीप थोरात, प्रकाश दुशिंग, दीपक शिनगारे, सोमनाथ लोहकरे, रामदास कोपरे, आनंद कोपरे, संदीप दुशिंग, राहुल कोपरे, सोमनाथ पाटोळे, संदीप कोपरे, पवन थोरात, आकाश सिंग, विकास दुशिंग, यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुलाचे सहकार्य केले. कोपरगाव शहरात प्रथमच संविधान दिनाला विक्रमी गर्दी झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा सुरु झाली.