रामदासीबाबांनी अलौकीक साधनेतुन चैतन्याचा ठेवा निर्माण केला – दत्तगिरी

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी अलौकीक साधनेतुन कोकमठाण पंचकोशीत चैतन्याचा ठेवा निर्माण केला असे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे परमशिष्य, श्री जुना पंचदशनाम आखाडयाचे वैजापूर येथील प पू. दत्तगिरी महाराज यांनी केले. 

          येथील श्रीक्षेत्र कोकमठाणचे ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या तेहतिसाव्या पुण्यतिथीनिमीत्त किर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचा प्रारंभ सोमवारी हभप रामदास महाराज वाघ, हभप भागवतानंद महाराज यांच्या हस्ते कलश, प्रतिमा व ग्रंथ पुजनाने करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी कोकमठाण पंचकोशीतील भाविकांनी उपस्थितांचे स्वागत केले.

पौरोहित्य सोमनाथ उर्फ रावसाहेब जोशी यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठ चालक ह भ प तुकाराम महाराज वेलजाळे, हभप ज्ञानानंदगिरी महाराज, हभप शेजगिरी महाराज यांच्यासह पंचक्रोशीतील भजनी मंडळे, भाविक, महिला मोठया संख्येने उपस्थित होते. 

दत्तगिरी महाराज पूढे म्हणाले की, कोपरगांवची भूमि संत महंतांच्या पदस्पर्शामुळे पावन झालेली आहे. ब्रम्हलिन संत रामदासीबाबा आणि कोकमठाणची भूमि हे अतुट नाते आहे., रामदासीबाबांच्या पुण्यतिथीनिमीत्त नामस्मरणाचा अव्यहत यज्ञ या ठिकाणी सुरू आहे. अध्यात्मात आवड असली तरी सवड काढावी लागते, विशेष करुन युवा पिढीने ज्ञानाबरोबरच अध्यात्मसेवेत सहभागी व्हावे त्यातुन चांगल्या संस्काराची संगत घडते. शेवटी भागवतानंद महाराज यांनी आभार मानले.