कोपरगाव पालीकेच्या बांधकाम विभागात शुकशुकाट, अधिकाऱ्याविना कार्यालय झाले शांत-आराम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : पालीकेच्या महत्वपूर्ण विभागांपैकी एक विभाग म्हणजे बांधकाम विभाग, ज्या विभागाच्या माध्यमातून शहराच्या अनेक विकास कामांना गती मिळते. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम बांधकाम विभागातून होते त्या बांधकाम विभागाला गेल्या दोन वर्षांपासून पुर्णवेळ बांधकाम अभियंता नाही. केवळ बांधकाम विभागाचा प्रमुख अभियंताच नाही तर गेल्या वर्षभरापासून इतर पाच अभियंत्यांचे पदे रिक्त असल्याने कोपरगाव नगरपालीकेच्या विकासाची गाडी बाहेरच्या सहाय्यक अभियंत्याच्या माध्यमातून चालत असल्याने शहराच्या विकासाला खिळ बसत आहे. कोपरगाव पालीकेच्या बांधकाम विभागाचा कारभार सध्या परावलंबी झाला आहे. 

 राहत्याचे अभियंता सुनील ताजवे यांच्याकडे कोपरगाव नगरपालीकेचा अतिरिक्त कारभार असल्याने ते आठवड्यातून एखादा दिवस कोपरगाव नगरपालीकेला देत असल्याने अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांसाठी अभियंता सुनिल ताजवे यांची कोपरगावकर देवासारखी वाट बघत असतात. त्यांच्याशिवाय कामे पुर्ण होत नाही. इतर कर्मचाऱ्यांना अधिकार नसल्याने आसुन आडचन नसुन खोळंबा अशी स्थिती कोपरगाव पालीकेची झाली आहे. 

बांधकाम विभागाला संगणक तज्ञ नाही, इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने चतुर्थ श्रेणीच्या अर्थात सफाई कामगाराकडून कार्यालयाची कामे करण्याची वेळ मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यावर आली आहे. संगणकीय ज्ञान नसलेले अनेक कर्मचारी असल्याने ठेकेदारी पध्दतीने काम करणारे अनुभवी एक कर्मचारी संपुर्ण बांधकाम विभागाचे कामकाज करीत होते. माञ कोपरगाव पालीकेच्या काही ठेकेदारांनी एकमेव असलेल्या कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी त्याही कर्मचाऱ्याची आरोग्य विभागात बदली केल्याने सध्या बांधकाम विभागात एकही अधिकारी पुर्णवेळ नाही, ना तांत्रिक कामे करणारा कर्मचारी नसल्याने या कार्यालयात सध्या रिकाम्या खुर्च्या आहेत.

या संदर्भात मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, अ वर्ग गटातील अभियंता विजय पाटील यांची गेल्या दोन वर्षांपूर्वी बदली झाल्यापासून पालीकेला आत्तापर्यंत एकही अधिकारी न मिळाल्याने त्या पदाचा कार्यभार गट ‘ब’ च्या स्थापत्य अभियंताकडे सोपवण्यात आला. परंतु गट ‘ब’ वर्गाचाही अभियंता गेल्या वर्षभरापासून नसल्याने तो पदभार राहत्याचे अभियंता सुनिल ताजवे यांच्याकडे अतिरिक्त देण्यात आला. तसेच गट ‘क’ चा स्थापत्य अभियंता नसल्याने त्या पदाचा कार्यभार शिर्डी नगरपंचायतीचे अभियंता ओंकार महाडीक यांच्याकडे अतिरिक्त देण्यात आला आहे.

 कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीतील लोकसंख्या लाखाच्या घरात असल्याने येथे पुर्णवेळ अभियंता असणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योचनांची अंमलबजावणी करण्यासाठी अपेक्षीत कर्मच्याऱ्यांचे संख्याबळ गरजेचे आहे. माञ शासनाच्या अंतर्गत अडचणींमुळे गेल्या दोन वर्षांपूर्वी पदे रिक्त आहेत. हे सर्व पदे भरण्याचा व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सर्व अधिकार राज्य नगरपरिषद संचालनालय यांना आहेत. पालीकेच्यावतीने वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे, माञ आजूनही संबधीत पदावर कर्मचारी मिळत नसल्याने कोपरगाव शहराच्या विकास कामांना गती मिळत नाही. 

  पुर्ण वेळ काम करणारे अधिकारी नसल्याने पालीका प्रशासन मानधनावर काम करणाऱ्या अभियंत्या मार्फत काम करावे लागत आहे. सध्या शासनाने नवीन नियमावली काढल्याने मानधनावर काम करणाऱ्या अभियंत्याकडून इतर कोणतेही काम करून न घेता केवळ पंतप्रधान आवास योजनेचे काम करुन घेण्याच्या सुचना दिल्याने कोपरगाव पालीका प्रशासनाची आडचण वाढली आहे. 

सध्या कोपरगाव पालीकेचे लिपिकांचे १८ पदे असताना केवळ ८ लिपिक कार्यरत आहेत. १० पदे आजुनही रिक्त असल्याने त्या जागी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याकडून कामे करुन घेण्याची वेळ आली आहे. एकाच अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार देवुन कामे करुन घेण्याची वेळ असल्याने सध्या आहे त्या अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा पडतोय. राज्यस्तरीय धोरणामुळे वेळेच्यावेळेला अधिकाऱ्यांच्या बदल्यात होत नसल्याने पालीका प्रशासनाची गोची होत आहे अशी खंत गोसावी यांनी व्यक्त केली.

 कोपरगाव पालीकेच्या बांधकाम विभागात अधिकारी नसल्याने शुकशुकाट दिसत आहे. ठेकेदारी पध्दतीने काम करणाऱ्या एका शांत कर्मचाऱ्याच्या जीवावर बांधकाम विभागाचे रामभरोसे कामकाज सुरु होते. आता त्याची बदली इतर विभागात केल्याने बांधकाम विभाग शांत – आराम झाले आहे.