तळेगांवमळे शिवारात उसतोडणी कामगारावर बिबटयाचा हल्ला

कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली

 कोपरगांव प्रतिनिधी, दि.१५ : कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत वाढल्याने पाळीव जनावरासह माणसांच्या जीव धोक्यात आला आहे. बिबट्यांचा खुलेआम वावर नागरी वस्तीत वाढला असुन शहराजवळील नागरीवस्तीत बिबट्या घुसत आहेत. 

तालुक्यातील वैजापुर, सुराळा आणि कोपरगांव, तळेगांवमळे शिवाराच्या हददीतील सिकंदरभाई यांच्या शेतात उसतोडणी करतांना कामगार अशोक कारभारी दळवी यांच्यावर भल्या पहाटे ४ वाजता बिबटयाने हल्ला केला त्यात त्यांच्या डोळयास व डाव्या हाताच्या अंगठयास मोठी इजा झाली आहे. 

           सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळवर उसतोडणीच्या कामासाठी मुकादम उत्तम पुंजाजी पगारे यांनी जळगांव जिल्हयातील भायगांव येथील उसतोडणी कामगारांची टोळी आणली असून त्यातील अशोक कारभारी दळवी हे बुधवारी भल्या पहाटे तळेगांवमळे शिवारात उसतोडणीसाठी गेले होते ते पहाटे ४ वाजता सिकंदरभाई यांच्या शेतात उसतोडणीचे काम करत होते.

उसाच्या पाचटामध्ये दडुन बसलेल्या बिबटयाने अचानक अशोक दळवी यांच्या हातावर आणि डोळयावर हल्ला केला. त्यात त्यांच्या डाव्या डोळयाच्या खाली इजा झाली, अशोक दळवी यांनी वेळीच स्वत:ला सावरले त्यामुळे पुढील अनर्थ टळला अन्यथा त्यांच्या जीवीतास मोठा धोका झाला असता.

            कोपरगांव तालुक्यात बहुसंख्य गावात बिबटयांचा वावर मोठय प्रमाणांत सुरू असुन वन विभागाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा या हिंस्त्रप्राण्यांच्या वावरामुळे लहान मुले मुली यांच्यात भितीचे प्रमाण वाढून त्यांच्यावर हल्ले वाढतील. शेतकरी शेती कामासाठी धजावत नाही बिबटयांची ही दहशत कमी करण्यासाठी वन विभागाने वेळीच उपाययोजना कराव्यात.