कचेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण

कोपरगांव प्रतिनिधी दि.१६ : सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगांव बेट भागातील प्रति त्रंबकेश्वर समजल्या जाणा-या कचेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी सुरू असुन अंतर्गत साफसफाई व रंग रंगोटीचे काम पुर्ण झाले आहे, भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने या पर्वकाळात दर्शन सोहळयासाठी उपस्थित रहावे असे आवाहन बेटवासिय व अखिल गुरव समाज संघटनेचे प्रदेश सचिव व कचेश्वर देवस्थानचे वंशपरंपरागत व्यवस्थापक पुजारी रमेश उर्फ काशिनाथ भाउराव क्षीरसागर यांनी केले आहे. 

           त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कचेश्वर मंदिर अतिशय पुरातन व ऐतिहासिक आहे त्याच्या दुरूस्तीबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच पुरातन वास्तु विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. तीर्थक्षेत्र अंतर्गत या देवस्थानचा विकास व्हावा अशी असंख्य भाविकांची मागणी आहे. गुरू शुकाचार्य यांच्याकडुन संजीवनी मंत्राची दिक्षा कचेश्वरांनी येथेच घेतली., संपुर्ण भारतभूमीत कोपरगांव बेट भागात कचेश्वराचे हे एकमेव मंदिर आहे. शिवरात्रीनिमीत्त साफ सफाई स्वच्छता पुर्ण करण्यांत आली आहे. 

           पुण्यक्षेत्र पुणतांबा चांगदेव महाराजांच्या समाधी सोहळयास जातांना कचेश्वरी संत निवृत्तीनाथ, बहिण मुक्ताई, पंढरीचा पांडुरंग यांनी मुक्काम करून पुढे नेवासा येथे वास्तव्य केल्याचा उल्लेख नामदेव गाथेत असुन यास्थानाला विशेष महत्व आहे. 

           ब्रम्हलिन शिवभक्त अरविंद महाराज हे कचेश्वरी नियमीत दर्शनास येवुन त्याबाबतचा प्रचार प्रसारात अग्रेसर असायचे. त्रंबकेश्वर तीर्थक्षेत्री होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम कचेश्वरी केल्यास सिध्द होतात असे प्रमाण वर्षानुवर्षे मानले गेले आहे. 

            यास्थानावर कालसर्पशांती, त्रिपींडी, नारायण नागबळी, ग्रहशांती, विवाह आदि धार्मीक कार्यक्रम विनामुहुर्त होतात. ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी कचेश्वरी छत्रीचा जीर्णोध्दार करून रूद्रयाग करत या स्थानाची माहिती संपूर्ण भारतभर पसरविली. त्यांचे येथे अनंतकाळ वास्तव्य होते. या छत्रीची दुरूस्ती व रंगरंगोटी तसेच कचेश्वर मंदिरसमोरील तुलसीवृंदावनाचे काम पुर्ण झाले आहे त्यामुळे हे स्थान अधिकच खुलून गेले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी कचेश्वरी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगांवबेटवासीयांनी केले आहे.