रांजणगाव देशमुख व परिसरात गारपिटीमुळे नुकसान, पंचनामे करण्याच्या आमदार काळेंच्या प्रशासनाला सूचना

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : कोपरगाव तालुक्यात रविवार (दि.०९) रोजी रांजणगाव देशमुख व परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांना दिल्या आहेत.

           हवामान खात्याच्या अंदाजानुसार ०९ एप्रिल पर्यंत पावसाचा अदाज वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे राज्यात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी व गारपीट झाली होती. मात्र कोपरगाव तालुका या नैर्सगिक संकटातून बचावला असे वाटत असतांना रविवार (०९) रोजी सायंकाळी कोपरगाव तालुक्याला फटका बसलाच. तालुक्यातील रांजणगाव देशमुख व परिसरात सायंकाळी ४ वाजता अचानक पावसाचे वातावर तयार होवून मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू पिकांचे तसेच फळ बागांचे व चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

            झालेल्या नुकसानीचे वृत्त समजताच आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांच्याशी संपर्क करून त्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार सोमवार (दि.१०) रोजी सकाळपासून प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. मागील वर्षी खरीप हंगामात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता.

अशा परिस्थितीत न डगमगता  शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पिके घेतली होती मात्र शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी सध्या अत्यंत अडचणीत आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत नैसर्गिक संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे अशा अचानकपणे येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचे आहवाल शासन दरबारी सादर करावेत अशा सूचना देखील आ. आशुतोष काळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.