सामाजिक ऐक्य व बंधुत्वाची भावना टिकवून ठेवा – बिपीनदादा कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि, २३ : हिंदू, मुस्लिम व इतर सर्व जाती-धर्मांचे सण, उत्सव शांततेत व आनंदात साजरे करण्याची व सामाजिक एकोपा राखण्याची परंपरा माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे  यांनी साठ वर्षांपूर्वी कोपरगाव शहर व तालुक्यात सुरू केली. ही परंपरा जपण्याचे काम आजही कोल्हे कुटुंब करत आहे. सर्व समाजबांधवांनी परस्परांविषयी द्वेष न बाळगता सामाजिक ऐक्य व बंधुत्वाची भावना टिकवून ठेवावी, असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला रमजान ईद अर्थात ‘ईद-उल-फित्र’ चा सण शनिवारी कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.   रमजान ईदनिमित्त कोपरगाव शहरातील ईदगाह मैदानावर  रमजान ईदची विशेष नमाज सामुदायिकरीत्या अदा केली. 

नमाजपठण झाल्यानंतर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी मुस्लिम समाजबांधवांची गळाभेट घेत त्यांना रमजानच्या तसेच आज अक्षय तृतीया, भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांनी सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बिपीनदादा कोल्हे म्हणाले, इस्लाम धर्मात रमजान महिन्याला आणि ईदला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांनी निरंकार उपवास (रोजा) करून अल्लाहची विशेष उपासना (इबादत) केली. रमजान महिन्याची सांगता आज ईदच्या सणाने झाली. रमजान ईद हा मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण आहे.

यावर्षी अक्षय तृतीया, रमजान ईद हे सण तसेच भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर जयंती आज एकाच दिवशी परंपरेप्रमाणे उत्साहात साजरे केले जात आहेत. मी आज मुस्लिम समाजबांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याचवेळी मौलाना व मुस्लिम बांधवांनी मला अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या. ही प्रेमाची, आपुलकीची आणि बंधुत्वाची भावना हिंदू व मुस्लिम समाजबांधवांनी टिकवून ठेवली पाहिजे. समाजात जातीय सलोखा टिकवून एकता व बंधुत्वाची भावना वाढीस लागली पाहिजे.

माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन व सर्वधर्मसमभाव जोपासून नि:स्वार्थीपणे समाजसेवा केली. राजकारण बाजूला ठेवून सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन सण, उत्सव उत्साहात साजरे करण्याची परंपरा सातत्याने जपली. त्यांचा हा वसा कोल्हे कुटुंब आजही समर्थपणे पुढे चालवत आहे.

मुस्लिम समाजबांधवांशी कोल्हे कुटुंबाचे स्व. शंकरराव कोल्हे यांच्यापासून ऋणानुबंध असून, यापुढेही हे ऋणानुबंध आपण, माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्याकडून कायम जपले जातील, अशी ग्वाही बिपीनदादा कोल्हे यांनी दिली.

याप्रसंगी मौलाना आसिफ साहब, रियाज सर, डॉ. जाकीरभाई, अल्ताफभाई कुरेशी, आरिफभाई कुरेशी, सद्दामभाई सय्यद, फिरोजभाई पठाण, खलिकभाई कुरेशी, फकीर महंमद पहिलवान, शफिकभाई सय्यद, असलमभाई शेख,भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगर परिषदेतील माजी गटनेते रवींद्रअण्णा पाठक, सुनील देवकर, रिपाइंचे प्रदेश सचिव दीपकराव गायकवाड, विनोद राक्षे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक व भीम सरकार ग्रुपचे संस्थापक जितेंद्र रणशूर, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक गोपीनाथ गायकवाड,

भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी नगरसेवक अशोकराव लकारे, जनार्दन कदम, दिनेश कांबळे, शिवाजीराव खांडेकर, दीपक जपे, वैभव आढाव, राजेंद्र बागुल, वैभव गिरमे, जगदीश मोरे, रवींद्र रोहमारे, सत्यन मुंदडा, सतीश रानोडे, समीर गवळी, बापू पवार, सिद्धांत सोनवणे, गोपीनाथ सोनवणे, विक्रांत सोनवणे, अर्जुन मोरे, कैलास क्षीरसागर, वैभव टोरपे, प्रसाद आढाव, शंकर बिर्हाडे, सुमित पाठक, आदींसह मुस्लिम समाजबांधव, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.