गोदावरी उजव्या कालव्याच्या टेल भागात तातडीने पाणी सोडावे – गंगाधर चौधरी 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : चालु पावसाळी हंगामात गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने डोळे वाटारल्याने शेतक-यांकडील पशुधनाला प्यायला पाणी नाही. नाशिक इगतपुरी घोटी भागात पावसाचे पर्जन्यमान ब-यापैकी आहे. त्यामुळे दारणा गंगापुर धरणे ८० टक्क्याच्यावर भरली आहेत. गोदावरी कालव्यांना नागरिकांना तसेच जनावरांचे पिण्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी येथील स्थानिक माजी लोकप्रतिनिधी स्नेहललता कोल्हे यांनी मंत्रालयीन स्तरावर केलेली आहे.

गोदावरी उजव्या कालव्या टेलच्या चितळी जळगाव भागात मोठया प्रमाणात पाण्यांचे दुर्भीक्ष्य आहे. तेव्हा उजव्या कालव्याचे टेल भागात तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी येथील लाभधारक शेतकरी गंगाधर भिवा चौधरी यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. 

ते म्हणाले की, तत्कालीन आमदार स्नेहललता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चालु पावसाळी हंगामात कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे कार्यक्षेत्रात तसेच अहमदनगर जिल्हयात पाऊसच नाही. त्यामुळे नागरिकांचे तसेच जनावरांचे पिण्याचे पाण्याचे हाल होत आहे. याबाबतची नेमकी वस्तुस्थिती सांगुन गोदावरी कालव्यांना पाणी सोडावे म्हणून मागणी केलेली आहे.

गोदावरी नदीस पाणी न सोडता बारमाही गोदावरी कालवे लाभक्षेत्रास पाणी सोडण्यात यावे जेणेकरून या कालव्यावर अवलंबुन असलेल्या विविध पिण्याच्या पाणी योजना तसेच जनावरांचे पिण्याचे पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होउन शासनाचा टँकरवरील खर्च वाचणार आहे. तसेच कालवा लाभक्षेत्रात पाणी सुटले तर त्याचा फायदा परिसरातील विहीरींना होउन या शेतक-याकडील पशुधनास काही प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. सध्या चितळी, जळगाव त्याचप्रमाणे पुणतांबा परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी टँकर सुरू आहेत.

जनावरांना पिण्यासाठी पाण्याची मोठया प्रमाणात गरज भासते, शेतक-याकडील पशुधन अडचणीत आले आहे. तेव्हा या सगळया गोष्टींचा शासनाने व जलसंपदा विभागाने प्राधान्याने विचार करून तात्काळ गोदावरी उजव्या कालव्याच्या टेल भागात पाणी सोडावे असेही शेवटी गंगाधर चौधरी म्हणाले.