कोल्हे यांनी मंजूर करून आणलेल्या निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आ. काळेंनी करू नये- डी. आर. काले  

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा. सदाशिव लोखंडे यांच्यामार्फत शासनदरबारी विशेष प्रयत्न करून कोपरगाव शहरातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५ कोटी २० लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे. असे असतानाही स्वत: काहीही न करता दुसऱ्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करून फुकटचे श्रेय लाटण्याची व चमचेगिरी करण्याची सवय लागलेल्या आ. आशुतोष काळे यांनी १५ ऑगस्ट रोजी या सर्व विकास कामांचे भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न केला. कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोल्हे परिवार कटिबद्ध आहे, असे चोख प्रत्युत्तर भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले यांनी आ. काळेंना दिले आहे.

डी. आर. काले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून, त्यात कोपरगाव रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामांसाठी केंद्र सरकारने २९ कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. हा निधीसुद्धा मीच मंजूर करवून आणला, असे सांगून श्रेय लाटण्याचा प्रयत्न आ. काळे यांनी नुकताच केला होता. लोकांना खोटे बोलून वेड्यात काढण्याची आणि कोणत्याही कामाचे व निधी आणल्याची श्रेय घेण्याची त्यांना सवयच झाली आहे.

गेल्या चार वर्षांत मी कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी २१०० कोटींचा निधी आणल्याचे आमदार जाहीरपणे सांगतात; पण हे साफ खोटे आहे. एवढा निधी जर मतदारसंघासाठी त्यांनी आणला असेल तर मतदारसंघातील सर्वच विकास कामे पूर्ण झालेली दिसली असती. सर्व समस्या सुटल्या असत्या. कोपरगाव शहर व मतदारसंघातील सर्व रस्ते गुळगुळीत व चकाचक झालेले दिसले असते. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच दिसत नाही. आ. काळे हे निव्वळ श्रेय लाटण्यासाठी खोटे बोलत असले तरी सुजाण जनतेने त्यांना चांगलेच ओळखले आहे. 

माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे हे मतदारसंघातील जनतेचे विविध प्रश्न सोडवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास बाळगून काम करत आहेत. स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याचे पाणी, आरोग्य, रस्ते, पूल, वीज, भूमिगत गटारी, ड्रेनेजलाईन, शिक्षण आदी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. त्यांनी कोपरगाव शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणून या निधीतून अनेक विकास कामे पूर्ण केली आहेत.

कोपरगाव शहरातील पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद कार्यालय, शहर पोलिस स्टेशन, नगर परिषद वाचनालय, एस. टी. बसस्थानक, अग्निशमन केंद्र, इंदिरा पथ ते गोकुळनगरी रस्त्यावरील पूल, बाजार ओटे आदी असंख्य कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. ज्या पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आ. काळेंचे आजोबा स्व. शंकरराव काळे यांचा पुतळा बसवला आहे. त्या पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठीचा निधीसुद्धा तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनीच मंजूर करून आणला होता. स्नेहलता कोल्हे यांच्याच प्रयत्नामुळे कोपरगाव शहरालगतचा ग्रामीण भाग नगरपरिषद हद्दीत नव्याने समाविष्ट झालेला असून, या हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांना रस्ते, गटारी व अन्य सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून १० कोटीहून अधिक निधी मंजूर करून आणला आहे. याची आठवणही डी. आर. काले यांनी आ. काळेंना करून दिली आहे. 

कोपरगाव शहरातील विविध भागातील रस्ते, पूल व अन्य विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून वेगवेगळ्या योजनांतर्गत जवळपास सव्वापाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या विकास कामांचे भूमिपूजन भाजप-शिवसेना महायुतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी सकाळी त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, दुपारनंतर आ. काळे यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे श्रेय घेण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला हाताशी धरून या सर्व कामांचे भूमिपूजन केले. हद्दवाढ भागातील तारांगण शॉप ते ड्रीम सिटी रस्त्याचे भूमिपूजनही आ. काळे यांनी उरकले.

आ. काळेंच्या कार्यकर्त्यांनी खोडसाळपणे जाणूनबुजून त्या ठिकाणी भाजप-शिवसेनेने लावलेल्या फ्लेक्स बोर्डच्या पुढे आपला फ्लेक्स बोर्ड लावला. त्यांना स्थानिक भाजप-शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तुमचा बोर्ड बाजूला लावा, अशी विनंती केली; परंतु त्यांनी हटवादी भूमिका घेऊन तो फलक हटविण्यास नकार दिला. अशाच प्रकारे काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेनेचे इतर भागातील फलक फाडले. त्यामुळे भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या. त्यानंतर प्रकरण जास्त चिघळू नये म्हणून विवेक कोल्हे तेथे आले.

पालकमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय शासकीय कार्यक्रम घेऊ नयेत, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला शासकीय निधीतून होणाऱ्या विकास कामाचे भूमिपूजनाचे कार्यक्रम कसे काय आयोजित केले, असे त्यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना विचारले असता, आमदारांनी सांगितल्यामुळे हे कार्यक्रम घेतल्याचे उत्तर त्यांनी दिले. यावरून आमदारांचा मुख्याधिकाऱ्यावर किती दबाव आहे, हे दिसून येते. सदर विकास कामांसाठी आम्ही शासनदरबारी प्रयत्न करून निधी आणला याचे तुम्हीसुद्धा साक्षीदार आहात, असे विवेक कोल्हे यांनी म्हटले. त्यावर मुख्याधिकारी गोसावी निरुत्तर झाले.

सदर फ्लेक्स बोर्ड काढण्यास सांगितले असता मुख्याधिकारी गोसावी यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सदर दोन्ही फ्लेक्स बोर्ड काढण्यात येतील. शांतता पाळा, अशी विनंती केली. त्यावर विवेक कोल्हे यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन कार्यकर्त्यांना शांत केले. नगरपरिषद प्रशासन आमदारांच्या हातचे बाहुले बनले असून, त्यांच्या इशाऱ्यानुसार काम करत असल्याबद्दल त्यांनी न. प. प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

हे सर्व चालू असताना आ. काळेंनी सामंजस्याची भूमिका घेण्याऐवजी कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन भडकावून दिले. याउलट विवेक कोल्हे यांनी सामंजस्याची भूमिका घेत भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांना शांत करून त्या ठिकाणाहून बाजूला घेऊन गेले. विवेक कोल्हे यांनी संयमी व सामंजस्याची भूमिका घेतली, त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.