शेवगाव – भगूर रस्त्याचे काम शिवसेनेने बंद पाडले

ठेकेदाराचा अजब प्रकार रात्री ११ वाजता केली कामाला सुरवात

शेवगाव प्रतिनिधी, दि.०९ : शेवगाव ते भगूर रस्त्याच्या कामाला कार्यारंभ देवून वर्ष होत आले तरी संबधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना शिंदे गटाने दि.१२ ऑक्टोबरला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍यानंतर संबंधित ठेकेदाराने या कामाला घाईघाईने रविवारी रात्री ११ चे सुमारास प्रारंभ केला. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समजताच शिवसेना शिंदे गटाने युवा शिवसेना जिल्हा प्रमुख साईनाथ आधाट व शिवसेना तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे यांच्या नेतृत्वा खाली काम सुरु असलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत ते काम बंद पाडले. यावेळी शिवसेना पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठेकेदार व ठेकेदाराला पाठीशी घालणार्‍या प्रशासनाचा धिक्कार केला.

शेवगावातील क्रांती चौक ते भगूर पर्यंतच्या रस्ता कामाला कोट्यावधीचा निधी वर्षभरापूर्वी मंजूर झाला होता. या कामाचा कार्यारंभ आदेशही ठेकेदाराला देण्यात आला. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडून लांबवले जात होते. यामुळे या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांतून मार्ग काढतांना वाहनचालकांचे हाल होतात. वाहनांचे नुकसान होते, अनेक अपघातही झाले आहेत. या संदर्भात तालुकाप्रमुख डहाळे यांनी निवेदनाद्वारे दि.१२ ऑक्टोबरला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍यानंतर रविवारी रात्री ११ चे सुमारास संबधित ठेकेदाराच्या यंत्रणेने शेवगावात दाखल होत रस्त्यावर खडी टाकून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली.

मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती डहाळे यांना समजताच त्यांनी तात्काळ युवा शिवसेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट, विशाल परदेशी, सोमनाथ कुरुंद, वैभव लांडे, मुज्जामिल शेख, आसीफ पठाण, अक्षय खोमने या शिवसेना पदाधिकार्‍यासह रस्ता काम सुरु असलेल्या ठिकाणी येवून पहाणी केली असता रस्त्यातील खड्डे थातूर-मातूर बुजवून त्यावरुन लागेच डांबरीकरण केले जात असल्याचे लक्षात येताच, त्यानी ते ‘ काम बंद करण्याची मागणी करून काम सुरु असलेल्या खड्ड्यातच ठिय्या मांडला. तसेच जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाडले.

यावेळी तालुका प्रमुख डहाळे म्हणाले , क्रांती चौक ते भगूर या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, संबंधित ठेकेदाराने शेवगावकरांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी या रस्त्याचे काम रात्री सुरु करुन थातूर-मातूर पूर्ण करण्याचे काम चालवले होते. हे काम शेवगावकरांच्या समाधानासाठी नसून अधिकार्‍यांच्या समाधानासाठी केले जात आहे. आता रहदारीच्या अडचणीचे कारण दाखवून हे काम रात्री सुरु केल्याचे सांगितले जाईल. मात्र, दिवस-रात्र या रस्त्याचा त्रास शेवगावकरांना सहन करावा लागत आहे. ठेकेदार हे काम शेवगावकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहे. मात्र, शिवसेना ही धूळफेक होवू देणार नाही. ठेकेदाराने हे काम दर्जेदार केले पाहिजे.