जायकवाडीला पाणी सोडून केला जाळ पिण्यासाठी आम्हाला मिळतो गाळ

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ : गेल्या कित्तेक वर्षांपासून कोपरगावच्या नागरीकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. जरी मिळाले तर तेही  आठदिवसाड दुषित पाणी मिळते. किमान गढुळ दुषित पाणी मिळते हेच आपलं भाग्य समजून कोपरगावच्या नागरिकांनी कोठेही तक्रार केली नाही. किंवा हक्काच्या पाण्यासाठी अपेक्षित आवाज उठवला नाही. जो कोणी आवाज उठवलाही असेल तरी त्या आवाजाने आज पर्यंत स्वच्छ, मुबलक, दररोज पाणी मिळाले नाही. राज्याच्या मुख्यमंञ्यापासुन ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत कोणालाही कोपरगावकरांच्या व्यथा समजल्या नाहीत. सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी जीवाचं रान करुन गल्ली पासुन दिल्ली पर्यंत पाणी प्रश्न मांडला. पदरचे पैसे घालून मंटाला यांनी पाण्याची व्यथा पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहचवली. पण पाणी प्रश्न मिटला नाही. 

कोपरगावच्या नागरीकांना दुषित पाणी पिण्याची सवय आहे. स्वच्छ पाणी पचत नसेल म्हणून की काय? सातत्याने आठदिवसाड दुषित पाणी दिले जाते. स्थानिक प्रशासन, राज्यकर्ते, वरिष्ठ नेते व वरिष्ठ शासन, प्रशासनाचे अधिकारी यांनी कोपरगावच्या नागरीकांना दुषित आठदिवसाड पाणी दिले तरी  कोणी काहीच बोलत नाहीत. याचा अंदाज प्रशासनाला येत गेला आणि चक्क गाळ मिश्रित पाणी देवुन कहरच केलाय. 

दारणा, गंगापुर सह गोदावरी खोऱ्यातील कोपरगावकरांच्या हक्काचे स्वच्छ पाणी डोळ्यांदेखत गोदावरी नदीतून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात सोडले. शेजारून नदी दुथडी भरुन वाहते पण नळाला पाणी नव्हते. कोपरगावच्या नागरीकांना साठवण तलावातील दुषित गाळमिश्रीत पाणी पिण्यासाठी देवून पालिका प्रशासनाने तर कहर केला. जनावरांनाही पिण्याच्या लायक पाणी नव्हते. असे गढुळ दुषित पाणी पुरवठा करून नागरीकांचा अंत पालिका प्रशासन पहात आहे. दुषित पाण्यामुळे नागरीकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. 

नेहमीच पाण्यावरून वाद करण्यापेक्षा गाळमिश्रीत आलेल्या पाण्याला नागरिकांनी गाळून, उकळून तुरटी टाकुन नितळ करण्याचा प्रयत्न केला. पण पाणी काही नितळ झाले नाही. नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कोपरगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन करून गेले. यावेळी आपल्या भाषणातून विखे यांनी कोपरगाव तालूक्यातील राजकारण ढवळून काढले. आपल्याच पक्षातील स्वकियांवर निशाणा साधत एका कार्यक्रमात म्हणाले होते की, मी लवकरच कोपरगाव तालुक्यातील राहीलेला गाळ काढुन तालुका स्वच्छ करणार असे म्हणाले.

त्यांच्या या बोलण्यातून काहींना असे वाटले की, पालकमंञी विखे यांनी गाळ काढणार म्हणाले आणि कोपरगावकरांच्या नळाला चक्क गाळमिश्रीत पाणी आले. विखे सहज बोलुन गेले पण नागरिकांच्या घराघरात गाळा आला. नागरिकांनी आलेल्या गढुळ पाण्यावरून नाराजी व्यक्त करण्या ऐवजी आश्चर्य  ज्यास्त व्यक्त केले. विखे बोलले आणि खरच गाळ आला. 

दरम्यान पिण्याचे पाणी गढुळ आल्याने अनेकांची हाल झाली. घरात पाणी असुन नसल्यासारखे झाले. राजकीय, सामाजिक, कार्यकर्ते समाज माध्यमातुन क्रिया प्रतिक्रिया देवून आपला संताप व्यक्त करीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी गढुळ पाणी आले म्हणून हांडा बडवत गावभर फिरले. काहींनी पालिका प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आठदिवस चर्चावर चर्चा सुरु राहणार आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करून एकमेकांचे वाभाडे काढतील. आमच्यामुळे पाणी आले, त्यांच्यामुळे पाणी गेले. म्हणत आपलीच पाठ थोपटून घेतील.‌ पाण्यावरून वादविवाद सुरुच राहील.

‘कोणी निंदा कोणी वंदा दररोज दुषित पाणी पिणे हाच आमचा धंदा. अशीच काहीशी अवस्था सामान्य नागरिकांची झाली आहे. रस्ता कमी खड्डा अशा रस्त्यावरुन प्रवास केल्याशिवाय प्रवास केल्यासारखे वाटत नाही. विज सतत बंद, चालु झाली पाहिजे. सुरळीत वीजपुरवठा नसण्याची सवय जडलीय. अस्वच्छ पाणी पिल्या शिवाय तहान भागत नाही. धुळीने माखुन आल्याशिवाय शहरात फेरफटका मारल्यासारखे वाटत नाही. जीवंत असताना मुलभूत गरजा पुरवल्या जाव्यात हि आशा सोडलेले कोपरगावकर आता स्वत:मध्ये बदल करुन घेत आहेत.

हक्काचे दररोज पाणी नाही, विज नाही, कोणतीही सुविधा नाही. अगदी व्याकुळ झालेल्या नागरीकांच्या व्यथा ऐकायला व मांडायला प्रशासनाचे अधिकारी जाग्यावर नसतात. माणुस म्हणून कोपरगावच्या नागरीकांना जे गरजेचे आहे ते का दिले जात नाही? अशी खंत बाहेरुन आलेले पाहुणे व्यक्त करतात. इतर तालुक्यासह जिल्ह्यात दारात पाळलेल्या जनावरांना स्वच्छ पाणी पाजले जाते पण कोपरगावच्या नागरीकांना वर्षानुवर्षे दुषित पाणी  पाजले जाते हे दुर्दैव आहे. 

दरम्यान काही सुज्ञ नागरिकांनी कोपरगाव शहराला मिळणारे पाणी पिणे बंद केले आहेत. काहींनी नळाला आलेल्या पाण्याला पुन्हा शुध्द करुण आपलं आरोग्य साभाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. माञ, कितीही शुध्द केले तरी शेवटी गाळ तो गाळच. पाणी रंगहीन व गंधहीन असतं असं सर्वञ बोलले जाते पण कोपरगावकरांच्या नळाला दरवेळेस रंगीबेरंगी व उग्र गंधयुक्त पाणी येते. वर्षानुवर्षे कोपरगावच्या नागरीकांना मुबलक स्वच्छ पाणी मिळत नाही. ही व्यथा नसुन ही कहाणी झाली आहे.

दरवर्षी पाण्यावरून राजकारण होते. अनेक निवडणुका केवळ पाणी प्रश्नावर गाजल्या पण हक्काचे स्वच्छ पाणी कधी मिळाले नाही. धरणात पाण्याचा तुटवडा आहे. म्हणून पालिकेच्या साठवण तलावात नियमित वेळेच्यावेळेला कालव्यातून आवर्तन सोडले जात नाही. जरी सोडले तर पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनाचे पाणी एकञ सोडले जाते. जलसंपदा विभाग कोपरगावच्या नागरिकांवर दया दाखवून पाणी भरुन घेण्यास सांगतो पण पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे तेही शक्य होत नाही. 

 आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून नव्या पाचव्या साठवण तलावाचे काम प्रगती पथावर सुरु आहे. सुदैवाने पाणी साठवण्याची क्षमा वाढणार आहे. पण पाटबंधारे विभाग वेळेवर मुबलक पाणी सोडत नसल्याने पाण्याचा तुटवडा भासतोय. माजी आमदार स्नेहलला कोल्हे यांच्या प्रयत्नातून निळवंडे धरणातून स्वच्छ पाणी बंद पाईपलाईनद्वारे कोपरगावला मिळणार होते. अशी चर्चा जोरदार रंगली पण मध्येच तेही पाणी गायब झाले. निळवंडेचे पाणी मिळाले नाही.

धरणाचे पाणी जायकवाडीला सोडून पाण्याचा तुटवडा निर्माण केल्याने हक्काचे पाणी मिळण्या ऐवजी चक्क गाळ मिळतोय. काहीही झालं तरी तालुक्याचे राजकारण ढवळले पण कोपरगावच्या नळांना गढुळ पाणी आले. त्यामुळे नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राजकीय सामाजिक नेते, कार्यकर्त्यांनी किमान आतातरी पाण्यावरून नागरीकांच्या जीवाशी खेळू नये. आज गरज आहे स्वच्छ पाण्याची. श्रेय कोणीही घ्या पण दररोज स्वच्छ पाणी द्या ही आशा नागरिकांची आहे.