कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे कुटुंबीयांची मोलाची साथ – राजेश मंटाला‌

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ : सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून कोल्हे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून नि:स्वार्थी भावनेने समाजसेवा करत असून, कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे कुटुंबीयांनी मला मोलाची साथ दिली. युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील प्रतिभावान व कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. त्यामुळे आमच्यासारख्या व्यक्तींना समाजकार्य करण्यासाठी आणखी बळ मिळते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राजेश बन्सीलाल मंटाला‌ यांनी केले.

याप्रसंगी राजेश मंटाला म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून, शहरवासियांना कधी ८ तर कधी १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. गंभीर बनलेला कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन डिजिटल स्वरुपात पाणी आंदोलन केले. एकाच वेळी माझ्यासह कोपरगाव शहरातील हजारो नागरिकांनी पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना ई-मेल पाठवले.

माझ्या पाणी प्रश्नाच्या लढ्यात विवेक कोल्हे यांनी घरी येऊन पाठिंबा दिला होता. त्यामुळे मला देखील लढण्यासाठी अधिक ऊर्जा मिळाली – राजेश मंटाला 

या आंदोलनात मला कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांची मोलाची साथ मिळाली. पंतप्रधान कार्यालयाने या डिजिटल पाणी आंदोलनाची दखल घेऊन कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न तत्काळ सोडविण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले. या आंदोलनामुळे कोपरगाव शहराच्या पाणीप्रश्नाला गती मिळून कोपरगाव नगरपालिकेला निधी प्राप्त झाला. मी गेल्या पाच-सहा वर्षांपासून पाणीप्रश्न सुटण्यासाठी लढा देत आहे, श्रेय कुणीही घेतले तरी आपल्याला प्रश्न सुटण्यासाठी काम करायला आवडते असे मंटाला यांनी सांगितले.

कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यात कोल्हे परिवाराचे मोठे योगदान आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी येसगाव शिवारात गोदावरी डावा कालव्याशेजारी कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्व साठवण तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवून दिल्या. या तलावासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्यात नोकऱ्या दिल्या. स्व. कोल्हेनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळवून दिला.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही कोपरगावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन त्यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करून नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना व त्यासाठी लागणारा कोट्यवधींचा निधी मंजूर करवून आणला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोल्हे कुटुंबीयांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी किती आणि कसे योगदान दिले, यासाठी राजेश मंटाला यांच्या प्रतिक्रियेमुळे भविष्यात अधिक कार्यासाठी बळ मिळेल.