स्नेहलता कोल्हे यांनी गोरगरिबांना पेढे वाटून आनंदोत्सव केला साजरा  

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर साकारले असून, या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व अनेक संत-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी झोपड्यांमध्ये राहून प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गरीब नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्ताने ‘मेरी झोपडी के भाग आज खुल जायेंगे, राम आयेंगे, राम आयेंगे’ या गाण्याची प्रचिती आली.

माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या कल्याणासाठी झिजवले. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले. स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने दुसऱ्यांसाठी चांगले काम करत रहा. त्यातच खरे समाधान असून, तीच खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे, अशी शिकवण दिली. स्व. कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे हे स्व. कोल्हे यांचा जनसेवेचा वसा जपत आजही समाजहितासाठी अखंड कार्य करीत आहेत.

तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्याचे श्रीरामभक्तांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. अयोध्येतील या नवनिर्मित मंदिरात सोमवारी (२२ जानेवारी) मोठ्या उत्साहात प्रभू श्रीरामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशभरामध्ये सगळीकडे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा सोहळा जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा साजरा करीत असताना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गोरगरीब लोकांची जाणीव ठेवून त्यांच्यासोबत हा आनंदोत्सव साजरा केला. 

त्यांनी कोपरगाव शहरात नगर-मनमाड महामार्गालगत मोहनीराजनगर भागात झोपडीत राहणाऱ्या गरीब नागरिकांना पेढे वाटप करून त्यांचे तोंड गोड केले. यावेळी त्यांनी या गरीब बांधवांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र नवीन मंदिरात विराजमान झाल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला. यानिमित्त देशभर सर्वत्र उत्साही वातावरण असताना स्नेहलता कोल्हे यांनी मोहनीराजनगर भागातील झोपडीत राहणाऱ्या गरीब नागरिकांना पेढे वाटून त्यांच्यासोबत हा सोहळा साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी त्यांनी प्रभू श्रीरामांचे पूजन करून वंदन केले. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गरीब बांधवांना श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने स्नेहलता कोल्हे यांच्यामुळे गोरगरिबांच्या झोपडीतदेखील श्रीरामलल्ला यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या या कृतीतून ‘मेरी झोपडी के भाग आज खुल जायेंगे, राम आयेंगे, राम आयेंगे’ या गाण्याचे प्रत्यंतर आले.  गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न सोडवून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम आपण यापुढेही अखंडपणे करीत राहू, अशी ग्वाही स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी दिली.