समृद्धी महामार्गावरील बोगदा रस्त्यांची उंची वाढवावी – परजणे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ५ : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर ठिकठिकाणी असलेल्या बोगद्यांमधील क्रॉस रस्त्यांच्या खोलीमुळे पावसाळ्यात पाणी व गाळ साचून आठ – आठ दिवस वाहतुकीची समस्या निर्माण होऊन दळणवळण विस्कळीत होते. शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या विचारात घेऊन बोगद्याखालील रस्त्यांची उंची ३१ डिसेंबरपर्यंत  वाढविण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी केली.

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,  महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे परजणे यांनी ही मागणी केलेली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, हिंदूहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा येत्या ११ डिसेंबर २०२२ रोजी देशाचे पंतप्रधान सन्मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ना. एकनाजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी या ५२० कि. मी. पूर्ण झालेल्या महामार्गाच्या कामाची पाहणी केली.

सदरचे काम पूर्णत्वास येत असल्याचा सर्वांना आनंदच आहे. या महामार्गाने दळणवळणासह वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. तथापि या महामार्गासाठी ज्या – ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारकडून संपादीत करण्यात आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांची आज काय अवस्था आहे याचाही विचार आपण करायला हवा ही रास्त अपेक्षा आहे.

समृध्दी महामार्ग तयार होत असताना अनेक गांवे, रस्ते, शिवरस्त्यांबरोबरच जिल्हा परिषदेचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांना छेद देत समृध्दी महामार्ग तयार झालेला आहे. ज्या  –  ज्या ठिकाणी रस्त्यांवर पूल तयार करण्यात आलेले आहेत त्या पुलाच्या बोगद्याखाली क्रॉस रस्त्याची उंची ठेवणे गरजेचे असताना त्याठिकाणी खोली तयार झालेली आहे.

या खोलीमुळे पावसाळ्यात बोगद्यामध्ये पाणी साचून वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. कमरेइतके साचणारे पाणी आणि गाळ, चिखल यामुळे शाळकरी मुले, नोकरदार, शेतकरी, रुग्ण यांना शहरात जाण्या – येण्यासाठी प्रचंड अडचणी निर्माण होतात. बोगद्यांखालील खोलीमुळे आठ-आठ दिवस पाणी व गाळ साचून राहते. यंदाच्या पावसाळ्यात हा अनुभव अनेकांनी घेतला आहे. संबंधित ठेकेदार तसेच संबंधित शासकीय अधिकारी वर्गास वारंवार ही परिस्थिती लक्षात आणून देऊन देखील काहिही उपयोग झाला नाही. कुणीही या गंभिर बाबींची दखल घेतली नसल्याने जनतेमधून प्रचंड नाराजी दिसून येते.

दि. ११ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होत असताना ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तुकडे झालेले आहेत, ज्या रस्त्यांची बिकट अवस्था झालेली आहे, ज्या रस्त्यांची बोगद्याखाली खोली झालेली आहे अशा सर्व रस्त्यांचा गाळ, चिखल काढून उंची वाढविणे गरजेचे आहे. संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकारी यांना सूचना करून सदरची कामे तातडीने करण्यास निर्देश द्यावेत. सदरची दुरुस्तीची कामे व उपाययोजना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत न झाल्यास ठेकेदार व अधिकारी वर्गास शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यातून उद्भवणाऱ्या परिणामास जिवीत हानीस व नुकसानीस संबंधित ठेकेदार व शासकीय यंत्रणा जबाबदार राहील असा इशाराही परजणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.