अतिवृष्टीचे अनुदान तातडीने द्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात कोपरगाव मतदार संघातील सर्वच गावातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. त्या नुकसानीचे पंचनामे देखील महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाकडून करण्यात आले आहे.

मात्र ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले असून उर्वरीत अनुदानाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. हे अनुदान तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्या अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोपरगाव मतदार संघात खरीप हंगाम २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, मका, कापूस, बाजरी आदी खरीप पिकांचे तसेच कांदा रोप, भाजी पाला व चारा पिकांचे मोठे नुकसान होवून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. अनेक ठिकाणी तर शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत असलेला शेतकरी अजूनच अडचणीत आला होता.

झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई अनुदान मिळेल या आशेवर बसलेला नुकसानग्रस्त शेतकरी आजही अनुदानापासून वंचित आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा देखील भरलेले आहेत मात्र पिक विमा कंपन्यांनी देखील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे.

कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात जवळपास ३४००० हेक्टर क्षेत्राचे ४६६९४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले  आहे. यापैकी ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे १.३१ कोटी मिळाले आहेत. परंतु सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे २७.३५ कोटी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ५३.९७ कोटी असे एकूण जवळपास ८१.३२ कोटी अनुदानाच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी आहेत.

सध्या रब्बी हंगामाची तयारी सुरु असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होणार आहेत. त्यामुळे तातडीने अतिवृष्टीचे अनुदान द्यावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.