कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीत सरासरी ७९.४४ टक्के मतदान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८: तालुक्यातील २६ ग्रामपंचायतच्या सावत्रिक निवडणुकीसाठी सरासरी ७९.४४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली. तालुक्यातील ९६ मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार न घडता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६९ टक्के मतदान पूर्ण झाले होते.

चासनळी येथील केंद्रावर संध्याकाळी उशिरापर्यंत मतदान सुरु होते. तहसीलदार बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीसाठीची जय्यत तयारी शासनाच्या वतीने करण्यात आली होती. मिनी विधानसभा म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीला महत्व असते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी माहेगाव देशमुख येथील केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. २६ ग्रामपंचायतमध्ये एकूण ५७३१० मतदारापैकी ४५५२८ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यात स्री मतदार २१६२६ तर २३९०२ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

२६ ग्रामपंचायतिच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी ८५ तर सदस्यपदासाठी तब्बल ५७१ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहे. सदस्यपदासाठी आठ उमेदवार याआधीच बिनविरोध म्हणून निवडून गेले आहेत. दोन्ही पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

२६ ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी वैध नामनिर्देशन अर्ज -१५९ यापैकी माघार घेतलेले उमेदवार संख्या -७४, बिनविरोध -०, एकूण शिल्लक अर्ज -८५, तर सदस्यासाठी वैध नामनिर्देशन अर्ज -८७०, माघार घेतलेले उमेदवार संख्या -२९१ बिनविरोध -८, एकूण शिल्लक अर्ज -५७१

माहेगाव देशमुख, शिंगणापूर येथे उभारण्यात आलेले नऊ सखी मतदान केंद्र लक्षवेधी ठरले. गुलाबी रंगात विशेष व वेगळ्या पद्धतीच्या सजावटीने हे केंद्र उभारण्यात आले होते. मतदान जागृती, महिला मतदार आकर्षित करून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी निवडणूक आयोगाने ह्या केंद्राची निर्मिती केली. तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद महिला शिक्षकांनी सखी केंद्रास उस्फुर्त प्रतिसाद देत पूर्ण जबाबदारी पार पाडली.