गोदाकाठ महोत्सवाला नागरिकांची तोबा गर्दी

आमदार काळेंनाही खाद्य पदार्थांची चव चाखण्याचा मोह आवरला नाही

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादनास हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मागील काही वर्षापासून कोपरगाव येथे सुरु झालेला गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ बनला आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरु झालेल्या २०२३ च्या गोदाकाठ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देखील नागरिकांची तोबा गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

दरवर्षी आतुरतेने वाट पाहणाऱ्या कोपरगाव तालुक्यासह शहरातील नागरिकांनी सलग तिसऱ्या दिवशी देखील गोदाकाठ महोत्सवाला मोठी गर्दी करून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू माफक दरात खरेदी केल्या. अस्सल ग्रामीण भागातील खाद्य पदार्थ यामध्ये विशेषत्वाने खान्देशचे मांडे आणि जे पदार्थ शहरात सहजासहजी उपलब्ध होत नाहीत अशा सर्व पदार्थांवर हजारो नागरिकांनी ताव मारला.  

गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, सहजपणे शहरातील नागरिकांपर्यत पोहोचविता येत आहेत. हक्काची शहरी बाजारपेठ अनुभवण्याची व या बाजारपेठेत आपल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची चांगली संधी उपलब्ध झाल्यामुळे गोदाकाठ महोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दरवर्षी बचत गटाच्या स्टॉल्सची संख्या वाढतांना दिसत असून त्याचबरोबर होणाऱ्या गर्दीचे विक्रम देखील मोडले जात आहे.

होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीतून बचत गटाच्या महिलांना नवी उमेद मिळत आहे. त्यामुळे ज्या उद्देशातून गोदाकाठ महोत्सव सुरु करण्यात आला आहे. तो उद्देश गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून साध्य झाल्याचे दिसून येत असल्याचे गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी सांगितले आहे.

 विविध वस्तूंच्या खरेदीसह शेकडो प्रकारच्या पदार्थांवर कोपरगावकरांना ताव मारता येत असल्यामुळे खरेदी बरोबरच खाद्य पदार्थाची मेजवानी असल्यामुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तीनही दिवस गोदाकाठ महोत्सवात खाऊ गल्लीमध्ये मोठी गर्दी होत आहे. आ.आशुतोष काळे यांनी देखील खाऊ गल्लीमध्ये फेर फटका मारला व बचत गटाच्या महिलांशी हितगुज साधले. त्यावेळी त्यांना देखील विविध पदार्थांची चव चाखण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी देखील स्वतः खाद्य पदार्थ विकत घेऊन आस्वाद घेत बचत गटांच्या महिलांचा उत्साह वाढवला.