निसर्गाच्या लहरीपणावर माजी आमदारांनी राजकीय पोळी भाजू नये – राजेंद्र खिलारी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १/९/२३ : खरीप पिकांना पावसाची आवश्यकता असतांना पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची पूर्व कल्पना आ. आशुतोष काळे यांना आल्यामुळे मागील एक महिन्यापासून शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई व मतदार संघात दुष्काळ जाहीर करावा यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे.

परंतु ज्यांनी  आपल्या कार्यकाळात पाच वर्ष फक्त मंत्र्यांसमवेत फोटो काढून व फ्लेक्स लावून मतदार संघातील जनतेची दिशाभूल केली त्या माजी आमदारांनी निसर्गाच्या लहरीपणावर आपली राजकीय पोळी भाजू नये असा उपरोधिक सल्ला भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस राजेंद्र खिलारी यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता दिला आहे.

पर्जन्य छायेखाली येत असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघात दरवर्षी पर्जन्यमान जेमतेमच असते परंतु यावर्षी पावसाने पूर्ण उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना निर्माण झालेला धोका व काही ठिकाणी पिके जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असला तरी मतदार संघात समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे जर पाऊस झाला नाही तर खरिप पिकांचे किती नुकसान होईल याचा पूर्व अंदाज घेवून खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी मागील तीन आठवड्यापासूनच आ.आशुतोष काळे शासनदरबारी पाठपुरावा करीत आहे.

मतदार संघात पावसाने पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही याची गांभीर्याने दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. खरीप हंगामातील बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग, कांदा आदी पिकांचे १०० टक्के नुकसान होणार असल्यामुळे आगावू पिक विमा रक्कम सरसकट द्यावी. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी यासाठी जिल्हाधिकारी ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे.

दोनच दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे टंचाई आढावा बैठकीत गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून सिंचनासाठी आवर्तन द्या व कोपरगाव मतदार संघात दुष्काळ जाहीर करा अशी आग्रही मागणी केली होती. त्या मागणीची गांभीर्याने दखल घेवून सिंचनासाठी वितरीकांना पाणी सोडण्यात आले आहे.

मात्र याची कर्तव्यशून्य माजी आमदारांना कल्पनाच नाही त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह सर्व सामान्य जनतेच्या तोंडचे पाणी पळाले असतांना आ. आशुतोष काळे शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करीत आहे मात्र दुसरीकडे माजी आमदार निसर्गाच्या लहरीपणावर आपली राजकीय पोळी भाजत आहे हे मतदार संघाच्या जनतेचे मोठे दुर्दैव असून समन्यायी पाणी वाटप कायद्यावर त्यांनी भाष्य करणे हास्यास्पद आहे.

ज्यावेळी समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला त्यावेळी माजी आमदारांचे मार्गदर्शक माजी मंत्री सत्तेत होते. त्यांच्याच मंत्रीमंडळाने समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मसुदा तयार केला व या कायद्याला २००५ मध्ये मंजुरी दिली. त्यावेळी माजी मंत्र्यांच्या पक्षाचे सरकार असतांना त्यांनी त्याबाबत ब्र शब्द सुद्धा काढला नाही परंतु २००५ ला विरोधी पक्षाचे आमदार असणाऱ्या माजी आमदारांवर समन्यायी पाणी वाटप कायद्याचे खापर फोडत आहेत.

मात्र जनता सुज्ञ आहे तुम्हाला केंद्रात व राज्यात तुमच्या पक्षाचे सरकार असतांना विकास करता आला नाही परंतु आ. आशुतोष काळे यांनी चार वर्षात कोट्यावधी निधी आणून मतदार संघाचा केलेला विकास तुम्हाला बघवत हि खरी पोटदुखी आहे. यामध्ये विशेष म्हणजे गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी देखील ३०० कोटी निधी मिळविला आहे. त्यापैकी ७२ कोटीच्या कामांना मंजुरी मिळून अनेक दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत हे पण पाहून घ्या असा सल्ला राजेंद्र खिलारी यांनी माजी आमदारांना दिला आहे.