मी ई-पिक नोंदणी केली, आपणही करा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुंजलेला असून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी. यासाठी शासनाच्या वतीने ई-पिक पाहणी मोहीम हाती घेण्यात आली असून या ई-पिक पाहणी अॅप च्या माध्यमातून मतदार संघातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी अंतर्गत आपल्या पिकाची नोंदणी करावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून ई-पिक पाहणी अॅप च्या माध्यमातून पिक नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्याच शेतातील पिंकांची ई-पिक नोंदणी करून करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की,२०१९ ते २०२२ मध्ये सातत्याने अतिवृष्टी होवून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर २०२३ मध्ये दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले असून यावर्षी अवकाळी पाऊस होवून द्राक्ष, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

आजपर्यंत कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे ज्या ज्यावेळी नुकसान झाले आहे. त्या त्यावेळी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. यावर्षी कोपरगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतांना देखील आपल्या मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्यात आला नव्हता. त्याबाबत शासनाकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे  मतदार संघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून कोपरगाव मतदार संघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाला आहे.

तसेच पिक विम्याची सोयाबीन पिकाची अग्रिम नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. तरी देखील यापुढील काळात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सातत्याने शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासनाने ई-पिक पाहणी अॅप च्या माध्यमातून शेतातील पिक नोंदणी सुरु केली आहे. या मोहिमेत मतदार संघातील सर्वच शेतकऱ्यांनी सहभागी होवून आपल्या पिकाची ई-पिक नोंदणी करावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले.

यावेळी तहसीलदार संदीपकुमार भोसले, नायब तहसीलदार सातपुते, उपसरपंच भास्कर काळे, सुंदर काळे, भागीनाथ काळे, प्रकाश काळे, जगन्नाथ जाधव, गणेश रोकडे उपस्थित होते.