कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना लाटेवर निवडून आलेल्या माजी लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यकाळात शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांना देवू शकल्या नाही. याउलट आ.आशुतोष काळे यांनी तीन वर्षात शासनाच्या विविध योजनांचा लाभ कोपरगाव तालुक्यातील हजारो गरजू लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे. त्यामुळे शासनाच्या योजना तळागाळातील गरजू लाभार्थ्यापार्यंत पोहोचल्या हि खरी विरोधकांची पोटदुखी असून त्यांचे युवराज माजी लोकप्रतिनिधींचे अपयश झाकण्यासाठी स्टंटबाजी करीत असल्याची टीका बहादरपुरचे सरपंच गोपीनाथ राहणे यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यावर दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केली आहे.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात सरपंच गोपीनाथ राहणे यांनी पुढे असे म्हटले आहे की, २०१४ ते २०१९ मध्ये माजी आमदारांकडे सर्व प्रकारची सत्ता असतांना देखील या पाच वर्षात संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना अशा सर्व योजना मिळून कोपरगाव तालुक्यातील केवळ दोन हजार दोनशे अकरा लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
याउलट ३ जानेवारी २०२० ते १६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना या योजनांचा कोपरगाव तालुक्यातील आठ हजार पाचशे पासष्ठ लाभार्थ्यांना आ. आशुतोष काळे यांनी लाभ मिळवून दिला असून येत्या काही दिवसात अजूनही एक हजार लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे.
माजी लोकप्रतिनिधिंना योजना समजण्यातच पाच वर्ष कसे गेले कळलेच नाही– माजी लोकप्रतिनिधींनीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेले दोन हजार लाभार्थी व आ. आशुतोष काळे यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेले आठ हजार लाभार्थी या आकडेवारीत जमीन-आसमानचा फरक आहे. कारण आ. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून पहिल्या दिवसापासून काम सुरु केले. याउलट लाटेवर निवडून आलेल्या माजी लोकप्रतिनिधींना शासनाच्या योजना समजावून घेण्यात पाच वर्ष कधी संपले व जनतेने त्यांना कधी घरी बसविले हे कळलेच नाही. -सरपंच गोपीनाथ राहणे
ज्यांच्या कार्यकाळात गरजू लाभार्थ्यांना या योजनांचा अत्यल्प लाभ मिळाला त्याच्या चारपट लाभ आ. आशुतोष काळे यांनी तीन वर्षात गरजू लाभार्थ्यांना मिळवून दिला हे शासकीय आकडेवारी सांगते.तुमच्याकडे पाच वर्ष सत्ता असतांना जर दोनच हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला याउलट चार वर्षात हाच आकडा चार पटीने वाढला आहे यावरून आ. आशुतोष काळेंची कार्यक्षमता दिसून येते.
आ. आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात लाभाच्या योजनांपासून वंचित असणाऱ्या हजारो लाभार्थ्यांना पंचायत समिती, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला असून यापुढील काळातही सर्वच पात्र लाभार्थ्यांना अशा योजनांचा लाभ मिळणार आहे. रेशन कार्ड धारकांना नियमित अन्न धान्य पुरवठा व्हावा याबाबत आ. आशुतोष काळे यांचे योग्य नियोजन सुरु असून रेशन कार्ड ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी देखील त्यांनी स्वत:ची यंत्रणा उभी केली आहे.
मात्र, नेहमीच राजकीय आकसापोटी नागरिकांची दिशाभूल करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची ज्यांना सवय आहे त्यांनी निळवंडेच्या पाण्याच्या बाबतीत देखील संभ्रम निर्माण करून दुष्काळी गावातील नागरिकांना वेड्यात काढायचे काम केले होते. मात्र, याउलट आ. आशुतोष काळे यांनी निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी दुष्काळी भागात आणून दाखविले.
त्याच पाण्याचे नेहमीप्रमाणे कोणतेही योगदान नसतांना माजी आमदारांनी जलपूजन करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.कोणत्याही विकास कामात राजकारण करायचे हि त्यांची जुनी सवय असून योगदान नसतांना श्रेय घेण्यासाठी सर्वात पुढे राहून जनतेत संभ्रम निर्माण करीत असले तरी जनता त्यांना चांगलीच ओळखून असल्याचे गोपीनाथ राहणे यांनी म्हटले आहे.