नियमित पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने प्रोत्साहनपर अनुदान द्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित पीक कर्ज भरीत होते त्या शेतकऱ्यांना देखील ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून कोपरगाव मतदार संघातील काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले आहे.

उर्वरित नियमित कर्जफेड करणारे अनुदानास पात्र शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर अनुदान तातडीने जमा करावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक चिंता दूर झाल्या आहेत. परंतु जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करीत होते त्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफी योजनेचा फायदा व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून कोपरगाव तालुक्यातील ६५०० शेतकऱ्यांपैकी ७४६ शेतकऱ्यांना या ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.

परंतु अजूनही हजारो शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम तातडीने मिळावी तसेच मागील दोन वर्षाच्या काळात ज्या शेतकऱ्यांच्या नावावर पीक कर्ज होते असे जवळपास ७१ कर्जदार शेतकरी मृत्यु पावले आहेत परंतु त्या मृत्यु झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम ही त्यांच्या वारसाने नियमितपणे भरून कर्ज फेड केली आहे.

त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या वारसांना हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे व हे अनुदान वाटप करतांना या शेतकऱ्यांच्या वारसांचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांचे अर्ज भरणे बाकी आहेत त्या शेतकऱ्यांनी कोळपेवाडी व कोपरगाव येथील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रोत्साहनपर अनुदान मागणी अर्ज भरून द्यावेत असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.