नागरिकांनी आयुष्मान भव: अभियानाचा लाभ घ्यावा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि, १३ : महायुती शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने १७ सप्टेबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयुष्मान भव: अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी आदी मोहिमा राबविण्यात येणार असून या आयुष्मान भव: अभियानाचा मतदार संघातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आरोग्य योजनांचे लाभ तळागाळातील नागरिकांसह गरजू लाभार्थ्यापर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी महायुती शासनाच्या वतीने आयुष्मान भव: अभियान राबविणार आहे. या अभियाना अंतर्गत ३० वर्षावरील सर्व नागरिकांचे सर्व आरोग्य केंद्रांवर रक्तदाब व मधुमेह आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, अंगणवाडी व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

या अभियानामध्ये प्रत्येक गावात आयुष्मान सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आरोग्य विमा योजना कार्डचे वितरण व ज्या नागरिकांना आजपर्यंत आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळाला नाही त्यांना आरोग्य खाते क्रमांक देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची ई केवायसी केली जाणार आहे. तसेच आपल्या देशाला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून क्षयरोग सारख्या संसर्गजन्य रोगाच्या निर्मूलनासाठी देखील या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून क्षयरोग बाधित रुग्णांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार देखील या आयुष्मान भव: अभियाना अंतर्गत करण्यात येणार आहे व त्याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारच्या सर्व आरोग्य योजनांचा लाभ मिळावा हा आयुष्मान भव: अभियानाचा उद्देश आहे. नागरिकांनी आरोग्याच्या बाबतीत नेहमी सजग राहिले पाहिजे यातूनच आपण निरोगी भारत देशाची निर्मिती करू शकतो. त्यासाठी प्रत्येक नागरिकाचा यामध्ये हातभार लागणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी महायुती शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने १७ सप्टेबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या आयुष्मान भव: अभियानाचा लाभ घेवून निरोगी भारत देश बनविण्यासाठी मतदार संघातील नागरिकांनी आपले कर्तव्य बजवावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.