साई समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेत वैभव आढाव व शरद वाघ यांची बिनविरोध निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : अल्पावधीत नेत्रदीपक प्रगती करून इतर सहकारी पतसंस्थांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोपरगाव येथील साई समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैभव सुधाकर आढाव तर उपाध्यक्षपदी शरद वसंत वाघ यांची सोमवारी (१२ फेब्रुवारी) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी नूतन अध्यक्ष वैभव आढाव व उपाध्यक्ष शरद वाघ यांचे अभिनंदन केले आहे.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या साई समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडण्यासाठी १० जानेवारी २०२४ रोजी बिनविरोध निवडणूक झाली होती. पतसंस्थेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सोमवारी (१२ फेब्रुवारी) नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैभव आढाव व उपाध्यक्षपदी शरद वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संचालक रमेश आभाळे, अप्पासाहेब काजळे, संदीप बारगळ, गोरख टुपके, अमोल घुमरे, रवींद्र पोळ, कृष्णकांत सानप, वृषाली ज्ञानदेव आसने, वृषाली प्रमोद कोताडे आदींची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृष्णा वाळके यांनी काम पाहिले. त्यांना पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रदीप गायकवाड यांनी सहकार्य केले.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी नूतन अध्यक्ष वैभव आढाव व उपाध्यक्ष शरद वाघ यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बिपीन कोल्हे म्हणाले, माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी अनेक सहकारी संस्था स्थापन करून त्या नावारूपाला आणल्या. त्यांनी सहकारी पतसंस्था, बँका व इतर सहकारी संस्थांना नेहमीच पाठबळ देऊन सहकार वाढविण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कोल्हे परिवार विविध सहकारी संस्थांना पाठबळ देत त्यांच्या प्रगतीसाठी काम करीत आहे.

स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनी २००३ साली येसगाव नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या पतसंस्थेच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. पुढे सन २०१७-१८ मध्ये या पतसंस्थेचे ‘साई समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था’ असे नामकरण करण्यात आले व संस्थेचे कार्यक्षेत्र बदलण्यात आले. साई समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेने अल्पावधीत सभासदांचा विश्वास संपादन करून मोठी प्रगती केली असून, प्रगतीची ही वाटचाल यापुढेही अशीच अखंड सुरू राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकारी संस्थांच्या विकासासाठी अनेक धोरणे आखली असून, त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. केंद्र व राज्य सरकारचे सहकारी पतसंस्थांना भक्कम पाठबळ असून, पतसंस्थांनी सध्याच्या स्पर्धेच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारावे. तसेच पारदर्शक व सुयोग्य कारभार करून सभासद व ठेवीदारांचा विश्वास संपादन करावा व संस्थेची प्रगती साधावी, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते शरदनाना थोरात, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास महाले, माजी पं. स. सभापती मच्छिंद्र टेके, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास रोहमारे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.