कोपरगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन

आमदार काळे व नगरपरिषदेच्या गलथानपणामुळे कोपरगावात तीव्र पाणीटंचाई 

 कोपरगाव प्रतीनिधी, दि. २२ : कोपरगाव नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या दुर्लक्षामुळे कोपरगाव शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, पाणीटंचाईमुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. तरीही नगर परिषद प्रशासन व आमदार गप्प आहेत. शहरातील पाणीटंचाई त्वरित दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्ष, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने दिला आहे. 

          भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पालिकेच्या श्वेता शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. 

    यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, भाजपचे माजी न. प. गटनेते रवींद्र पाठक, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, रिपाइंचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी नगरसेवक अतुलशेठ काले, बबलू ऊर्फ नयनकुमार वाणी, राजेंद्र बागुल,  आदींसह भाजप, शिवसेना व रिपाइं (आठवले गट) चे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कोपरगावात ज्यावेळी चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आठ दिवसांआड झाला त्यावेळी नगरपालिका प्रशासन व आमदार आशुतोष काळे यांनी असे सांगितले होते की, ही पाणीटंचाई तात्पुरती आहे. लवकरच गोदावरी कालव्यांचे रोटेशनचे पाणी आले की, चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू होईल; पण दीड महिना उलटला तरी गोदावरी कालव्यांचे आवर्तनाचे पाणी आले ना, चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू झाला. कालवा दुरुस्तीचे श्रेय घेण्यासाठी आमदार काळे प्रयत्न करतात तसा प्रयत्न कोपरगावला दररोज सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी टीका प्रयत्न करत नाहीत.  निष्क्रिय आमदार काळे व पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोपरगाव शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 

  माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरात ठिकठिकाणी बोअरवेल घेऊन त्यावर विद्युत मोटारी बसवून पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे  पाणीटंचाई जाणवत नव्हती. सध्या या बोअरवेल व विद्युत मोटारीची काय अवस्था आहे, त्यापैकी किती चालू व बंद आहेत, कोपरगाव शहराला पिण्याच्या पाण्याचे रोटेशन कधी येणार व पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार याचा खुलासा आमदार काळे व पालिका प्रशासनाने करावा अशी मागणीही या निवेदनात केली आहे.

           गोदावरी कालवा दुरुस्तीचे काम सुरू असल्याने कोपरगावला शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून आम्हाला सांगण्यात आले, नगरपालिका व पाणीपुरवठा योजनांकडून तसेच औद्योगिक क्षेत्राकडून पाण्याची मागणी वाढत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निळवंडे-शिर्डी-कोपरगाव पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली; पण काही विघ्नसंतोषी लोकांनी यामध्ये राजकारण आणून त्यास विरोध केला. त्यामुळे ही योजना बाजूला पडली असून गेल्या तीन वर्षापासून पाच नंबर साठवण तळ्याचे नाटक करून शहरवासीयांना वेड्यात काढले त्याचेही काम आज बंद आहे.

               कोपरगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शहरातील सर्व राजकीय पक्ष, समाजाचे अध्यक्ष, विविध संस्था, संघटनांचे प्रमुख, समाजसेवक, नागरिक यांनी निळवंडे-शिर्डी-कोपरगाव पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याची एकमुखी मागणी शासनाकडे करावी, असे आवाहन शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केले.           भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई म्हणाले, कोपरगाव शहराला सध्या आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे आणि आज कोपरगावकरांवर ही वेळ का आली याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

           आम्ही नगरपालिकेत दोन ठराव घेतले होते. त्यापैकी एक ठराव होता ५ नंबर तलावाचा आणि दुसरा ठराव होता निळवंडे-शिर्डी-कोपरगाव पाणीपुरवठा योजनेचा. परंतु विघ्नसंतोषी मंडळींनी निळवंडे-कोपरगाव पाणीपुरवठा योजनेचा ठराव बाजूला ठेवला आणि ५ नंबर तलावाच्या कामाकडे अधिक लक्ष दिले. मात्र, ५ नंबर तलावाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. तलाव खोदून काहीही होणार नाही. कारण, ४ नंबर तलावाचे काम पूर्ण कोपरगाव शहराला पाणीपुरवठा सुरू झाला तेव्हा कोपरगावला दिवसाआड पाणी दिल्यास ९० दिवस पुरेल इतकी त्याची साठवण क्षमता होती. 

            आता कोपरगावची लोकसंख्या इतकी वाढली आहे की, फक्त १४ दिवस साठवण तलावातील पाणी पुरेल, अशी आजची स्थिती आहे. त्यामुळे कितीही तलाव खोदले तरी पाण्याची परिस्थिती अशीच राहिली असती म्हणून माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून निळवंडे-शिर्डी-कोपरगाव पाणीपुरवठा योजना मंजूर करवून आणली. मात्र, कोपरगावसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या व शहरवासियांना रोज शुद्ध व मुबलक पाणी देणाऱ्या या योजनेत काही मंडळींनी खोडा घातल्याने ती अद्याप मार्गी लागली नाही.

             कोपरगावातील जबाबदार लोकांनी याबाबत उदासीनता दाखविली. कोपरगावच्या भल्याचा विचार कोणी करायलाच तयार नाही ही दुर्दैवाची बाब आहे. निळवंडे-शिर्डी-कोपरगाव पाणीपुरवठा योजना त्वरित मार्गी लागण्यासाठी नागरिकांनी कोपरगाव नगर परिषदेच्या विरोधात उठाव केला पाहिजे. चांदेकसारेजवळ स्मार्ट सिटी होणार होती; पण ती आमदार आशुतोष काळे यांच्या चुकीमुळे घालवली. तेथे स्मार्ट सिटी झाली असती तर कोपरगावला खूप फायदा झाला असता. व्यापार, उद्योगवाढीला चालना मिळाली असती; पण कुणाच्या तरी सांगण्यावरून आमदारांनी ही चांगली योजना घालवली. 

           आता समृद्धी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंजला कोपरगावचे नाव द्या, अशी मागणी करण्यात काय अर्थ आहे, असे म्हणत सातभाई यांनी आमदार काळे यांच्यावर टीका केली. निळवंडे-शिर्डी-कोपरगाव पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यानंतर कोपरगाव शहराला दररोज शुद्ध पाणी मिळणार आहे; पण स्नेहलता कोल्हे यांना श्रेय मिळू नये म्हणून काही मंडळींना कोर्टात जायला लावून या योजनेला विरोध करण्यात आला, अशी टीका राजेंद्र सोनवणे यांनी केली.

          शिवसेनेचे कैलास जाधव म्हणाले, शहरात पाणीटंचाईमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असताना नगर परिषद प्रशासनाने बघ्याची भमिका घेतली आहे. संजयनगर, सुभाषनगर, गांधीनगर व झोपडपट्टी भागातील नागरिकांकडे पाणी साठवण्याची सोय नाही. भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कोपरगाव शहरासाठी निळवंडे धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना मंजूर झाली. या योजनेतून कोपरगाव शहराला नियमित शुद्ध पाणीपुरवठा होणार होता. या योजनेसाठी कोपरगाव नगर परिषदेला एक रुपयाही खर्च येणार नव्हता. शिर्डीचे साईबाबा संस्थान व शासन सर्व खर्च करणार होते; परंतु विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी या योजनेत खोडा घातला. 

           येसगाव येथील ५ नंबर साठवण तलावाचे काम झाले तर कोपरगावकरांना दररोज पाणी देऊ, वर्षभर नियमित पाणीपुरवठा करू, अशी खोटी आश्वासने आ. काळे यांनी दिली. मात्र, अजूनही ५ नंबर तलावाचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या शहराला आठ दिवसांआड पाणी मिळत आहे. आ. काळे हे पाणीप्रश्नावरून घाणेरडे राजकारण करत असून, त्यांच्यामुळेच आज कोपरगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटील बनला आहे. राजकारणासाठी कोपरगावकरांची कशासाठी जिरवाजिरवी करायची, कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोळपेवाडीला एकत्र बसून चर्चा करू, असे विवेक कोल्हे यांनी अनेकवेळा म्हटले; पण आमदार काळे हे एकत्र चर्चा करायलाही तयार नाहीत आणि पाणीप्रश्नही सोडवित नाहीत. 

           निळवंडे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आणि ५ नंबर तलाव झाला तर कोपरगावचा पाणीप्रश्न सुटणार आहे. यात काळे-कोल्हे या दोघांनाही श्रेय मिळणार आहे. तीन महिन्यांपासून ५ नंबर साठवण तलावाचे काम बंद आहे; पण आ. काळे यांचे त्याकडे लक्ष नाही. तेथील माती, मुरूम विकून खाल्ला आणि पुढारपण करत आम्ही कोपरगावचा विकास केला, असे ते सांगतात. कोपरगावला आठ दिवसांआड गटारमिश्रित पाणी येत आहे. हा कसला विकास आहे, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. 

            आ. काळे यांनी गेल्या तीन वर्षात विकासाचे कोणतेही ठोस काम केले नाही. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष असताना आ. काळे यांनी मनात आणले असते तर निळवंडे पाणी योजनेचा प्रश्न एका झटक्यात मार्गी लागला असता; पण त्यांना काहीही करायचे नाही. केवळ खोटे बोलून कोपरगावकरांना झुलवत ठेवायचे आहे. अशा लोकांचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो, असे सांगून त्यांनी आ. काळे यांच्यावर घणाघाती टीका केली.

             रिपाइंचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर म्हणाले, यावर्षी भरपूर पाऊस झाला आहे. धरणे भरली आहेत. अशा परिस्थितीत कोपरगावला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यास केवळ नगर परिषदेचे प्रशासक व तालुक्याचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. आ. आशुतोष काळे हे स्वत:ला कोपरगाव तालुक्याचे कुटुंबप्रमुख म्हणवून घेतात. तर मग त्यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना जो आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे त्याचीही जबाबदारी घेतली पाहिजे. कोपरगावला फक्त एक दिवस पाणी पुरेल इतकाच पाणी साठा येसगावच्या तलावात शिल्लक आहे आणि कालवा दुरुस्तीचे काम १ तारखेपर्यंत सुरू होणार नाही, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. जर तळ्यात पाणी येणार नसेल, जानेवारीमध्ये १५ दिवसांआड पाणीपुरवठा होणार असेल तर याचीही जबाबदारी कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही घ्यावी, असे रणशूर यांनी आ. काळे यांना सुनावले. 

         स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कोपरगावसाठी निळवंडे धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना मंजूर झाली; पण त्याला राजकीय विरोध झाला, कोर्टात कोण गेले हे संपूर्ण कोपरगाव तालुक्याला माहीत आहे. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ. काळे यांनी काहीच केले नाही. आता राज्यात भाजप-शिंदे गट युतीचे सरकार सत्तेवर आहे. स्नेहलता कोल्हे यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून निळवंडे पाणी योजना येत्या अडीच वर्षांत नक्की मार्गी लावू आणि कोपरगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू, असेही ते म्हणाले.