कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सदस्यावरुन रस्सीखेच

 काळे कोल्हे गटाची सत्तेसाठी जुळवाजुळव

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : आमदार आशुतोष काळे यांच्या आमदारकीच्या निधीतून विकास कामे केल्याच्या दाव्यावरुन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागरीकांनी विकासाला मत दिल्याचे सांगुन आपल्याच कामाचा करिष्मा असल्याने तब्बल १५ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवल्याचे काळे गटाच्यावतीने सांगण्यात आले तशी चर्चा त्यांच्या गटात सुरु आहे.

तर दुसरीकडे माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या कार्यकर्तृत्वामुळे तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडूण येण्यात कोल्हे यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाचे उमेदवार जरी काळे गटाचे निवडून आले असले तरी शहापूर, हांडेवाडी, चासनळी व पढेगाव या ४ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच काळे गटाचा असला तरी तिथे सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य कोल्हे गटाचे निवडून आल्याने कोल्हे यांची सत्ता आहे. तसेच  देर्डे को-हाळे व  खोपडी या दोन ग्रामपंचायती मध्ये सरपंच कोल्हे गटाचा निवडून आले असले तरी काळे गटाचे सर्वाधिक सदस्य निवडून असल्याने काळे गटाची सत्ता आहे. 

 तालुक्यातील वेस सोयेगाव ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष सरपंच व ४ सदस्य अपक्ष निवडून आल्याने येथे अपक्षांचा बोलबाला आहे. 

काळे कोल्हे यांच्यामध्ये सध्यातरी सदस्य संख्यावरून खेचाखेची सुरु झाली आहे. सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य आपलेच निवडून आल्याचा दावा दोन्हीकडून केला जात आहे. अपक्ष निवडून आलेल्या काही सरपंच व सदस्यावर आपला दावा करुन सदस्य संख्या दोन्ही गटाकडून वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. काळे गटाच्या म्हणण्यानुसार तालुक्यातील २६ ग्रामपंचायती पैकी तब्बल १५ ग्रामपंचायतीचे सरपंच काळे गटाचे तसेच १२७ ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याचा दावा केला तर कोल्हे गटाच्या वतीने २६ ग्रामपंचायती पैकी १६ सरपंच व १२५ सदस्य आपल्या गटाचे निवडुन आल्याचा दावा केला आहे. 

 दरम्यान राहता तालुक्यातील नपावाडीचा यात सामावेश केल्यास काळे गटाने येथे सरपंच पदाचा दावा करीत १६ सरपंच आपल्या गटाचे असल्याचे सांगितले. तर कोल्हे गटाचे सर्वाधिक सदस्य असल्याचा दावा केल्याने दोन्ही गटाची रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना  व अपक्षांची गोळाबेरीज वेगळीच असल्याने गावपातळीच्या सत्तापरिवर्तनात  कोणत्या गटात कोण सामाविष्ट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील काळे कोल्हे या दोन मातब्बर गटापुढे माञ इतरांची दाळ फार काही शिजली नसली तरी मताच्या विभागणीत त्यांचा वाटा लक्षणीय आहे हे विसरुन चालणार नाही. येत्या काही दिवसांत सत्तेचा खरा झेंडा कोणाचा फडकतो हे लवकरच कळणार आहे.